Breaking News
नवी मुंबई : लॉकडाऊनमध्ये सर्वांचीच आर्थिक घडी विस्कटी आहे. पथविक्रेत्यांवर त्याच परिणाम झाला आहे. अनेकांवर उपासमारीची वेळ आली. उपजीविका पुन्हा सुरू करण्यासाठी केंद्र शासनाच्या माध्यमातून ‘पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी’ योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेद्वारे पथविक्रेत्यांना 10 हजार रुपयांपर्यंत खेळते भांडवली कर्ज उपलब्ध करून दिले जाणार असून, नवी मुंबई शहरातील जास्तीतजास्त पथविक्रेत्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महापालिकेच्या माध्यमातून करण्यात आले आहे.
कोरोना संसर्गामुळे पथविक्रेत्यांपुढे भागभांडवलाचा प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे नवी मुंबई महापालिकेने ‘पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी’ ही सूक्ष्म पतपुरवठा योजना सुरू केली आहे. यामध्ये पथविक्रेता, ठेलेवाला आदी सहभागी होऊ शकतात. फळे, भाज्या, तयार खाद्यपदार्थ, पाव, अंडी, चहा, चप्पल, कापड, कारागिराद्वारे उत्पादित वस्तू, स्टेशनरी, पानदुकान, पुस्तके आदींचा यात समावेश आहे. ही योजना 24 मार्च म्हणजेच लॉकडाऊन सुरू होण्यापूर्वी शहरात पथविक्री करीत असलेल्या सर्व पथविक्रेत्यांना लागू राहणार आहे. यामध्ये पालिकेचा परवाना (ओळखपत्र) प्राप्त असलेले पथविक्रेते आणि ज्यांचे सर्वेक्षण झाले आहे; परंतु परवाना प्राप्त झालेला नाही अशा पथविक्रेत्यांना अर्ज भरता येणार आहे. तसेच जे पथविक्रेते लॉकडाऊनपूर्वी पथविक्री करीत होते; परंतु काही कारणाने त्यांचे सर्वेक्षण झालेले नाही अशा पथविक्रेत्यांना महापालिकेचे शिफारस पत्र आवश्यक आहे. या योजनेंतर्गत नागरी पथविक्रेते एक वर्षाच्या परतफेड मुदतीसह 10 हजार रुपयांपर्यंतचे खेळते भांडवलकर्ज घेण्यास आणि त्यांची दरमहा हफ्त्याने परतफेड करण्यास पात्र असतील. सदर कर्ज विनातारण असणार असून, विहित कालावधीमध्ये किंवा त्यापूर्वी कर्जाची परतफेड करणारे पथविक्रेते वाढीव मर्यादेसह पुढील भांडवल कर्जासाठी पात्र ठरणार आहेत. व्याजदर बँकांच्या प्रचलित व्याजदराप्रमाणे तसेच रिझर्व्ह बँकेच्या सूचनांनुसार विहित कालावधीत कर्ज परतफेड केल्यास ते 7 टक्के व्याज अनुदान मिळणार आहे. ही रक्कम अर्जदाराच्या कर्जखात्यात तिमाहीप्रमाणे जमा केली जाईल.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai