Breaking News
आश्रमातच उभारले कोरोना उपचार केंद्र
नवी मुंबई : कोरोनाची लागण झालेल्या अंध व गतिमंद वृद्धांच्या उपचारासाठी नवी मुंबई महापालिकेने ऐरोलीतील प्रेमदान आश्रमातच उपचार केंद्र सुरू करून त्यांना नवे जीवन दिले आहे. स्वत:हून काही न करू शकणार्या अशा वृद्धांवर उपचारात येणार्या अडचणी लक्षात घेऊन पालिकेने हा प्रयत्न यशस्वी करून दाखवला आहे. त्यामुळे कोरोना काळात पालिकेने दिलेल्या आधारामुळे व प्रेमामुळे येथील 166 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
कोरोनाची बाधा होऊन मृत पावणार्यांमध्ये वयस्कर व इतर आजार असणार्यांचा सर्वाधिक समावेश आहे. त्यामुळे वयस्कर व्यक्तींची पालिकेकडून विशेष काळजी घेतली जात आहे. अशातच पालिकेपुढे नवे आव्हान उभे राहिले होते. ऐरोली येथील प्रेमदान आश्रमातील वृद्ध महिलांना कोरोनाची लागण होऊ लागली होती. ही बाब समोर येईपर्यंत दोन महिलांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे आश्रमातील सर्वच वृद्ध महिलांची कोरोनाची चाचणी करण्याचे ठरविण्यात आले, परंतु वयाची साठी ओलांडलेल्या या महिलांमध्ये दृष्टिहीन, विकलांग, तसेच गतिमंद अशा प्रकृतीच्या समस्या होत्या. यामुळे चाचणीसाठी त्यांना इतरत्र घेऊन जाण्यातही अडचणी होत्या. त्यामुळे प्रेमदान आश्रमातच या ज्येष्ठांची चाचणी करून पॉझिटिव्ह आढळणार्यांवर तिथेच उपचार करण्याचा निर्णय पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी घेतला. त्यासंबंधीच्या सूचना मिळताच नागरी आरोग्य केंद्र प्रमुख डॉ.वर्षा तळेगावकर व डॉ.सचिन नेमाने यांच्या पथकाने प्रत्यक्षात येणार्या सर्व अडचणींना सामोरे जात आश्रमातच सर्व ज्येष्ठ महिलांची चाचणी केली. त्यामध्ये 144 पैकी 122 महिलांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. यामुळे त्यांच्यावर उपचारासाठी आश्रमाच्या जागेतच काळजी केंद्र उभारण्यात आले. त्या ठिकाणी चोवीस तास उपलब्ध राहतील, अशा चार महिला डॉक्टरांसह 15 परिचारिकांचे पथक करण्यात आले. त्यांच्याकडून गतिमंद, विकलांग, तसेच दृष्टिहीन महिलांच्या नियमित औषध उपचाराची काळजी घेतली जात होती. पालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या आधारामुळे 116 वृद्ध महिलांनी कोरोनावर मात केली आहे. त्यात एका 90 वर्षीय महिलेचाही समावेश आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai