Breaking News
संपूर्ण जगात योग दिवस लोकप्रिय झाल्यानंतर केंद्र शासनाने सन 2016 पासून राष्ट्रीय स्तरावर दरवर्षी येणार्या दीपावली सणाच्या कालावधीतील धनत्रयोदशी अर्थात धन्वंतरी जयंती हा दिवस राष्ट्रीय आयुर्वेद दिवस म्हणून साजरा करण्याचे निश्चित केले आहे. भगवान धन्वंतरी हे आरोग्य शास्त्राचे आराध्य दैवत मानले जाते. आरोग्यसंवर्धन होण्यासाठी म्हणून धन्वंतरी जयंती साजरी केली जाते. आयुष मंत्रालय भारत सरकार यांच्या निर्देशानुसार यावर्षी हा दिवस दिनांक 13 नोव्हेंबर 2020 रोजी संपूर्ण देशात राष्ट्रीय आयुर्वेद दिवस म्हणून साजरा केला जाणार आहे. या दिनाचे घोषवाक्य हे AYURVEDA FOR COVID 19 PANDEMIC अर्थात कोरोनासाठी आयुर्वेद हे आहे.
आयुर्वेद हे प्राचीन भारतीय वैद्यकशास्त्र आहे. आयुर्वेद ही उपचारपद्धती नसून जीवन पद्धती आहे. आरोग्यसंपन्न दीर्घायुष्यासाठी आवश्यक आहार-विहार व आचार इत्यादीचे वर्णन या शास्त्रात केले आहे. विश्वस्वास्थ्य आणि विश्वकल्याण या हेतूने प्राचीन ऋषीमुनींनी नि:स्वार्थपणे या शास्त्राचे जतन व संवर्धन केले आहे. हा भारतीयांचा अनमोल ठेवा आहे. आयुर्वेदाचे प्रयोजन हे स्वस्थस्य स्वास्थ्यरक्षणम आतुरस्य विकारप्रशमनम च अर्थात निरोगी व्यक्तीचे आरोग्य अबाधित ठेवणे आणि हे आरोग्य सांभाळताना जर रोग झालाच तर, त्यावर उपचार करणे हे आहे. यात आरोग्यसंपन्न जीवन जगण्याला प्रथम प्राधान्य दिले आहे तर रोगावरील उपचाराला दुय्यम स्थान दिले आहे.
सध्या कोरोनासारख्या वैश्विक संकटाने संपूर्ण जग त्रस्त झाले आहे. या संसर्गजन्य आजाराचा प्रतिबंध व उपचार याबाबत केंद्रशासन, राज्यशासन, स्वयंसेवी संस्था यांच्या मार्फत शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. शासनाने वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग यांच्यामार्फत या आजाराच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणेतील जबाबदार अधिकार्यांना आयुष उपचार पद्धतीचा वापर करण्याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी टास्क फोर्स ऑफ आयुष फॉर कोविड-19 ची स्थापना दिनांक 13 मे 2020 च्या शासन निर्णयाद्वारे करण्यात आली व या टास्क फोर्समार्फत वेळोवेळी या आयुष उपचाराबाबत मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आल्या. एकीकडे संसर्ग होऊ नये म्हणून वरील उपाययोजना करणे आणि चुकून संसर्ग झालाच तर कोरोनासदृश्य आजार होऊ नये म्हणून रोगप्रतिकारशक्ती उत्तम राहील याकडे विशेष लक्ष देणे महत्त्वाचे आहे. मग ही रोगप्रतिकारशक्ती चांगली राहावी म्हणून आयुर्वेदाने ज्या महत्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत त्याचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे.
1 दिनचर्या - दिनचर्या म्हणजे आपण सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत करावयाच्या बाबी. यामध्ये सकाळी लवकर उठणे, दंतधावन, गंडूष, नस्य, प्राणायाम, योगासने, व्यायाम ,अभ्यंगस्नान इत्यादि बाबी अंतर्भूत आहेत. भूक लागली तरच योग्यमात्रेत भोजन करणे, दुपारी न झोपणे, रात्रीचे जेवण लवकर घेणे, रात्री जागरण न करता लवकर झोपणे इत्यादी बाबी महत्त्वाच्या आहेत.
2 ऋतुचर्या- यामध्ये ऋतूनुसार आपल्या या दैनंदिन आहार-विहारात बदल करणे आवश्यक आहे. सध्या हिवाळा आहे यात गरम पाणी पिणे उबदार कपडे घालने अभ्यंगस्नान करणे तसेच चवनप्राश इत्यादी रसायन रव्याचे सेवन करणे.
3. जलपान- अर्थात पाणी पिणे आयुर्वेदात निरोगी व्यक्तीने देखील अल्प प्रमाणात पाणी प्यावे असे सांगितले आहे. अस्वस्थ अल्पशा असे वर्णन आयुर्वेदात आले आहे. तहान नसताना सकाळी उठल्यावर पाणी पिणे टाळावे तहान लागलेली नसताना पाणी पिल्यामुळे भूक मंदावते व श्वसनसंस्थेचे/पचनसंस्थेचे वेगवेगळे आजार होण्याची शक्यता असते.
4. गण्डूष व नस्य- यामध्ये हळद किंवा त्रिफळा चूर्ण टाकून गरम पाणी गरम करून त्याने गुळण्या कराव्यात तसेच तिळाचे तेल किंवा खोबर्याचे तेल एक चमचा तोंडामध्ये घ्यावे व ते आत फिरवावे व दोन ते तीन मिनिटे गुळण्या कराव्यात यालाच गंडूष असे म्हणतात. सकाळ संध्याकाळ दोन्ही नाकपुड्यामध्ये तेल किंवा तुपाचे चार-चार थेंब सोडावेत यालाच नस्य असे म्हणतात. यामुळे नाकातून व तोंडातुन कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता कमी होऊ शकते. 5. उष्णजल- उष्णोदकोपचारि स्यात अर्थात गरम पाणी पिण्यासाठी वापरावे. हे पाणी गरम करताना त्यात सुंठ, तुळस, दालचिनी, मिरे, बडीसोप इत्यादी द्रव्ये टाकून ते पाणी उकळून कोमट करून प्यावे.
6. आहार- आहार नेहमी पचायला हलका, गरम असा असावा. भूक नसताना काहीही खाऊ नये. भूक जर कमी असेल तर मुगाच्या दाळीचे सूप प्यावे. जेवणात हळद ,जिरे, धने, लसूण,मिरे इत्यादी मसाल्याच्या पदार्थाचा वापर करावा. गोड पदार्थ, तळलेले पदार्थ, अतिथंड फ्रीजचे पदार्थ घेणे टाळावे.
7.आर्द्रक- दररोज जेवणापूर्वी आर्द्रकाचा छोटासा तुकडा मीठ लावून चावून खावा यामुळे भूक चांगली लागते.
8. दूध- दूध देताना त्यात सुंठ टाकून ते ते उकळून घ्यावे व त्यात एक चमचा हळद पावडर टाकावी व असे दूध रोज घ्यावे. ज्यांना सर्दी, पडसे किंवा श्वास इत्यादी कफाचा त्रास आहे त्यांनी दूध न घेणे उत्तम!
9 च्यवनप्राश- रोज सकाळी दोन चमचे च्यवनप्राश दुधातून घ्यावा. हा घेतल्यानंतर जोपर्यंत भूक लागत नाही तोपर्यंत नाश्ता किंवा जेवण करू नये. ज्यांना मधुमेह आहे त्यांनी हा चवनप्राश साखररहित (शुगर फ्री) घ्यावा.
10.अग्नि- आयुर्वेदाने बहुतेक सर्व आजार हे अग्नी मंद असल्यामुळे अर्थात भूक नसताना आहार सेवन केल्यामुळे होतात असे म्हटले आहे. बरेचदा आपण जेवणाची वेळ झाली म्हणून भूक नसताना नाश्ता किंवा जेवण करतो हे योग्य नाही. लॉकडाऊन मुळे बरेच जण घरीच असल्याने वेगवेगळे पदार्थ करून (करमणूक म्हणून) खातात. त्यामुळे भूक मंदावते, अपचन होते. परिणामी कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता बळावते म्हणून भूक नसताना कटाक्षाने काही खाऊ नये.
11. मानसिक स्वास्थ्य- हे उत्तम ठेवणे आवश्यक आहे. यामध्ये दररोज कपालभाती, अनुलोम-विलोम, भ्रळमरी भश्रीका, सूर्यनमस्कार, योगासने इत्यादी बाबी नियमित कराव्यात आणि नेहमी सकारात्मक विचार करावेत.
वरील सर्व बाबीचे पालन केले तर आपली रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. अशाप्रकारे उपरोक्त सर्व बाबी कोरोनाचा संसर्ग होण्यापूर्वी आणि झाल्यावर देखील चालू ठेवाव्यात. तसेच शासनाने ठरवून दिलेल्या मार्गदर्शक सूचनेनुसार आयुर्वेद तज्ञाच्या सल्ल्याने आयुर्वेद उपचार घ्यावेत. यामध्ये गुळवेलीचा काढा, संशमनीवटी, अडुळसा, ज्येष्ठमध, सुंठ व आयुष काढा इत्यादी औषधे आयुर्वेद वैदयाच्या सल्ल्याने घ्यावीत. थोडक्यात उपरोक्त बाबीचे पालन करून कोरोनाचा संसर्ग होऊ न देणे आणि त्यासोबतच याविरुद्ध आपली रोगप्रतिकारशक्ती वाढवणे तसेच भुकेला जपणे (अर्थात भूक नसताना काहीही काही न खाता अजीर्ण अपचन होऊ न देणे) आणि मानसिक स्वास्थ्य उत्तम ठेवणे या बाबी कटाक्षाने पाळण्याचा संकल्प आज आपण यानिमित्ताने करू या आणि कोरोनासोबत जगायला शिकू या.
(वैद्य. व्यंकट पुरुषोत्तम धर्माधिकारी सहाय्यक संचालक आयुष पुणे, तथा विभाग प्रमुख, आयुर्वेदकक्ष,)
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai