Breaking News
नवी मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साध्या पद्धतीने घरच्या घरी, फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याचे आवाहन यापुर्वीच शासनाने केले आहे. नवी मुंबई पोलीसांनीही साध्या पद्धतीने दिवाळी साजरी करण्याच्या सूचना केल्या आहेत. यादरम्यान ध्वनिप्रदूषण करणार्या व्यक्तींवर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचाही इशारा देण्यात आला आहे. तर गर्दी जमेल अशा सर्व प्रकारच्या सार्वजनिक कार्यक्रमांवर तूर्तास बंदी घालण्यात आली आहे.
राज्यासह नवी मुंबईत अद्याप कोरोना पूर्णपणे नियंत्रणात आलेला नाही. त्यामुळे शासनाने प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार नवी मुंबई पोलीस आयुक्त बिपीनकुमार सिंह यांनी तशा प्रकारचे आदेश जारी केले आहेत. या आदेशान्वये शहरात दिवाळीनिमित्ताने कोणताही सार्वजनिक कार्यक्रम घेण्यावर बंदी घालण्यात आली आहे. तर अशा प्रकारचा कार्यक्रम कोणाला घ्यायचा असल्यास, नागरिकांची गर्दी जमणार नाही या उद्देशाने तो ऑनलाइन प्रदर्शित करावा, अशाही सूचना करण्यात आल्या आहेत. तसेच प्रत्येक क्षेत्रात निर्देशित केलेल्या प्रमाणाच्या बाहेर फटाक्यांमुळे ध्वनिप्रदूषण झाल्यास संबंधितांवर कारवाई केली जाणार असल्याचेदेखील स्पष्ट केले आहे. कोरोनाबाधित व्यक्तींना पूर्णपणे बरे होण्यास एक ते दीड महिन्याचा कालावधी लागतो. यादरम्यान त्यांना इतर कोणताही त्रास झाल्यास त्यांची प्रकृती खालावू शकते. अशातच दिवाळीत फोडल्या जाणार्या जादा आवाजाचे फटाके व धूर करणारे फटाके त्यांना त्रासदायक ठरू शकतात. शिवाय प्रदूषणाची पातळी वाढू शकते. यामुळे ज्यांना श्वसनाचे इतर आजार आहेत त्यांच्या अडचणी वाढू शकतात. यामुळे औद्योगिक, व्यापारी, निवासी आणि शांतता क्षेत्रात आवाजाची मर्यादा ठरवून देण्यात आली आहे. त्या मर्यादेपेक्षा जास्त आवाज झाल्यास ध्वनिप्रदूषणाला कारणीभूत धरून कारवाई केली जाणार आहे. तसेच कामानिमित्ताने घराबाहेर वावरताना मास्क व सामाजिक अंतर यांचे पालन करून स्वत:सह परिवाराचे कोरोनाचा संसर्ग होण्यापासून संरक्षण करण्याचेही आवाहन पोलिसांमार्फत करण्यात आले आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai