Breaking News
नवी मुंबई ः नेरुळ-बेलापूर ते खारकोपर दरम्यानची लोकल सेवा 20 नोव्हेंबरपासूून सुरु करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी व महिला यांच्यासाठी सुरुवातीला या मार्गावर प्रत्येक दिवशी 8 लोकल फेर्या चालवण्यात येणार आहेत. त्यामुळे या मार्गाने प्रवास करणार्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
कोरोनाच्या पार्श्वभुमीवर लागलेल्या टाळेबंदीमुळे मागील आठ महिन्यांपासून लोकल सेवा बंद आहेत. टप्प्याटप्प्याने ही सेवा पुर्ववत करण्यात येत आहे. 15 जून पासून अत्यावश्यक सेवेकर्यांसाठी मर्यादित प्रमाणात लोकलची वाहतूक सुरु झाली. त्यानंतर सरसकट महिलांना वेळेचे बंधन घालून प्रवासाची मुभा देण्यात आली. सध्या मध्य रेल्वे मुख्य मार्ग, हार्बर मार्ग आणि ट्रान्सहार्बर मार्गावर दररोज 1 हजार 572 उपनगरी सेवा चालविण्यात येत आहे. आता चौथ्या मार्गिकेवर म्हणजेच नेरुळ-बेलापूर - खारकोपर मार्गावर 8 उपनगरी सेवा जोडल्याने आता मध्य रेल्वेवर एकूण लोकल सेवा 1 हजार 580 होणार आहेत.
वाढलेल्या प्रवासी संख्येनुसार मध्य रेल्वेने यापूर्वी सुध्दा सीएसएमटी ते गोरेगाव लोकलची वाहतुक पुन्हा सुरु केली होती. आता त्याच पाठोपाठ नेरुळ-बेलापूर-खारकोपर दरम्यानची लोकल देखील धावणार आहे. शुक्रवार पासून नेरुळ ते खारकोपर आणि बेलापूर ते खारकोपर दरम्यान प्रत्येकी 4-4 फेर्या चालवण्यात येणार आहेत. या फेर्यांमुळे उलवे परिसरातून मुंबईच्या दिशेने कामावर येणार्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. या मार्गावर टाळेबंदीआधी दिवसाला लोकलच्या 40 फेर्या धावत होत्या. या मार्गावरील प्रवासी संख्या सुमारे 50 ते 60 हजारांच्या घरात आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai