Breaking News
जेव्हीपीआर कंपनीच्या निवडीला मंजुरी ; महिन्याभरात होणार कामाला सुरुवात
पनवेल : केंद्र सरकारच्या अमृत योजनेअंतर्गत पनवेल महापालिकेने आखलेली 408 कोटींची पाणी पुरवठा योजना मागील चार वर्षापासून तांत्रिक कारणामुळे रखडली होती. आता कंत्राटदार निवडीला निविदा समितीकडून मंजुरी मिळाली असल्याने या योजनेचा मार्ग मोकळा झाला आहे. महिन्याभरात या कामाला सुरुवात होणार असून कामाचा कालावधी 30 महिन्यांचा आहे. त्यामुळे दोन वर्षांनंतर पनवेलकरांची पाणीटंचाई कायमची संपण्याची चिन्हे आहेत.
पनवेल शहरवासियांना दरवर्षी तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागतो. यासाठी 408 कोटींची अमृत पाणी पुरवठा योजना पालिकेने आखली आहे. कधी कंत्राटदाराची पात्रता तर कधी निविदेची क्षमता एवढेच नव्हेतर विविध प्राधिकरण पनवेल व उरणमध्ये कार्यरत असल्याने त्यांचा न मिळणारा निधी यामुळे ही योजना रखडली होती. लोकप्रतिनिधींनी वेळोवेळी सचिवालयात याबद्दल आवाज उचलला होता. पनवेल पालिकेचे तत्कालिन आयुक्त गणेश देशमुख व विद्यमान आयुक्त सुधाकर देशमुख यांनी सचिवालयात केलेल्या शिष्ठाईमुळे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या या नस्तीला गती मिळाली आहे. या योजनेमुळे 228 दश लक्ष लीटर पाण्याची उपलब्धता पाताळगंगा नदीतून पनवेलला होणार आहे. यासाठी जेव्हीपीआर या कंपनीची निवड केली असून 247 कोटी रुपयांची विविध कामे पुढील महिन्यापासून सुरू होणार आहेत.
या कामानंतर पनवेल पालिकेला यातील शंभर एमएलडी, एमएमआरडीए क्षेत्राला 19, जेएनपीटी बंदराला 40 तर सिडको वसाहतींना 69 एमएलडी पाणी मिळणार आहे. 161 कोटी रुपये एमजेपी पंपींग यंत्रसामुग्री व इतर कामांसाठी खर्च करणार आहे. सध्या एमजेपीने पालिका व इतर प्राधिकरणांसोबत करार करण्याची प्रक्रीया सुरू केली आहे. प्राधिकरणाचा कार्याध्येश देण्याची कार्यवाही झाल्यानंतर प्रत्यक्षात कंत्राटदार काम करु शकेल. सुमारे 25 किलोमीटर लांबीच्या विविध जलवाहिन्यांमध्ये 965 व 1950 मीलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीने पाणी पुरवठा करणार आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai