Breaking News
केवळ 4 मीटरचा रस्ता बांधला ः अर्धवट रस्त्याच्या श्रेयासाठी आरोप-प्रत्यारोप
पनवेल ः गेले चार वर्षापासून कामोठेतून मुंबईकडे जाणारा रस्ता अर्धवट अवस्थेत होता. यामुळे कामोठेकरांना 1 कि.मी चा वळसा घालून किंवा उलट दिशेने जीव धोक्यात घालून मुंबईकडे जावे लागत होते. मात्र आता चार मीटरचा रस्ता बनविला असून शनिवारपासून तो वाहतूकीसाठी खुला झाला आहे. अर्धवट रस्त्याचे श्रेय घेण्यासाठी राजकीय पक्षात आरोप प्रत्यारोप सुरु असून उर्वरीत 8.5 मीटरचा रस्ता पुर्ण कधी होणार या सामान्यांच्या प्रश्नांकडे कोणाचेही लक्ष नाही. या अरुंद रस्त्यामुळे तेथे वाहतूक कोंडी होऊन प्रदूषणासही आमंत्रण मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
कामोठे शहरातून बाहेर पडून पनवेल-सायन महामार्गावर जाण्यासाठी कळंबोली उड्डाणपुलाला वळसा घालावा लागत असल्याने कामोठकरांची गैरसोय होत होती. परंतु ही गैरसोय शनिवारपासून दूर झाली. पाच वर्षे रखडलेल्या या डाव्या वळणाचे काम अनेक राजकीय पक्ष, सामाजिक संस्थांच्या पाठपुराव्यामुळे पूर्ण झाले. परंतु याचे श्रेय भाजपने घेण्याचा प्रयत्न केला असून रस्त्याच्या उद्घाटनाचा कार्यक्रम शनिवारी आयेाजित करण्यात आला होता.
पाच वर्षांपूर्वी सायन-पनवेल महामार्गाचे रुंदीकरण करून काँक्रिटीकरण करण्यात आले. सुरुवातीला 1200 कोटी रुपयांचा खर्च पुढे वाढत गेला. सिडकोने वसविलेल्या कामोठे शहरातून बाहेर पडून सायन-पनवेल महामार्गावर येण्यासाठी सुविधा करण्यात आली. मात्र मुंबईच्या दिशेने वळण घेऊन पुढे जाण्यासाठी कांदळवनाचे कारण सांगून रस्ता पूर्ण करण्यात आला नाही. वनविभाग परवानगी देत नसल्याचे कारण सार्वजनिक बांधकाम विभागाकडून पुढे केले जात होते. मुंबईच्या दिशेने जाण्यासाठी नागरिक, वाहनचालक जीव मुठीत घेऊन विरुद्ध दिशेने जाऊन सायन-पनवेल महामार्ग गाठत होते. कळंबोली पुलाचा वळसा वाचविताना मागील पाच वर्षांत 25 जणांना जीव गमवावा लागला. रस्ता पूर्ण करण्यासाठी कामोठ्यातील सामाजिक संस्थांसह शेकाप, शिवसेना, मनसे अशा सगळ्या राजकीय पक्षांनी आंदोलन केले. मात्र रस्ता पूर्ण करता आला नाही. शेकापचे नेते, सिटिझन्स युनिटी फोरम, सामाजिक संस्था आदींनी मंत्रालयात जाऊन या रस्त्याच्या पाठपुरावा केल्यानंतर उर्वरित रस्त्याचे काम पूर्ण करण्यासाठी मंजुरी दिली. ठरल्याप्रमाणे जवळपास दोन महिन्यांच्या कालावधीत कामोठे डाव्या वळणाचे काम पूर्ण केले. मात्र चार मीटर रुंदीची एकच मार्गिका काढण्यात आली आहे. काहीच मार्ग नसण्यापेक्षा कामोठ्यातून मुंबईच्या दिशेने जाण्यासाठी कामोठेकरांना रस्ता निर्माण झाला आहे. उर्वरीत मार्गिकेच्या कामांत वनविभागाचा अडथळा असल्यामुळे ते काम पूर्ण होऊ शकणार नाही. शनिवारपासून हा मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. त्यामुळे कामोठ्यातील नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
राजकीय पक्षात आरोप-प्रत्यारोप
भाजपने रस्त्याचे गुपचूप उद्घाटन करून श्रेय घेण्याचा प्रयत्न केल्यामुळे रस्ता पूर्ण होण्यासाठी अनेक वेळा आंदोलन केलेल्या सामाजिक संस्था, शेतकरी कामगार पक्ष, शिवसेना आदींनी भाजपवर आरोप केले आहेत. शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख संजय मोरे यांनी हा रस्ता केवळ आमच्यामुळेच झाल्याचा दावा केला आहे. कामोठे कफचे देखील आम्ही वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा केल्यामुळेच रस्ता पूर्ण झाल्याचे म्हणणे आहे. भाजपचे नगरसेवक विजय चिपळेकर यांनी आमदार प्रशांत ठाकूर यांनी वेळोवेळी सरकारकडे केलेल्या पाठपुराव्याच्या तारखा प्रसिद्ध करून हे फक्त भाजपचेच श्रेय असल्याचे म्हटले आहे.
8.5 मीटरचा रस्ता कधी होईल?
सायन-पनवेल मार्गावरील उड्डाणपुलाच्या बाजूने खारघरकडे जाणारा हा रस्ता नियोजनाप्रमाणे 12.5 मीटरचा असला पाहिजे. मात्र हा रस्ता केवळ चार मीटरचाच आहे. सार्वजनिक बांधकाम खाते केवळ चार मीटरचा रस्ता पूर्ण करू शकले आहे, कारण उर्वरित भागात कांदळवनाच्या अडचणीमुळे वनविभाग हा रस्ता पूर्ण करण्यासाठी परवानगी देत नाही. त्यामुळे हा रस्ता आजही अर्धवट स्थितीत आहे. उर्वरित 8.5 मीटरचा रस्ता कधी होईल, याबाबत कोणीही जाब विचारायला तयार नाही. सध्या एकावेळी एकच चारचाकी वाहन या रस्त्यावरून जाऊ शकते.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai