Breaking News
2 कोटी 24 लाख बँक खात्यात 4 हजार 653 कोटीच्या ठेवी
नवी दिल्ली : प्रधानमंत्री जन धन योजनेत जुलै अखेर महाराष्ट्रात 2 कोटी 24 लाख 5708 बँक खाती उघडण्यात आली असून या खात्यात 4 हजार 653 कोटी 69 लाख रुपयांच्या ठेवी जमा आहेत. देशात आजपर्यंत 32 कोटीहून अधिक बँक खात्यात 80 हजार कोटीच्या ठेवी जमा झाल्या आहेत.
देशातील प्रत्येक घरात एक बँक खाते असावे या उद्देशाने ऑगस्ट 2014 पासून प्रधानमंत्री जन धन योजना सुरू करण्यात आली. गेल्या चार वर्षात देशभरात या योजनेमुळे आर्थिक समावेशनाला चालना मिळाली असून जुलै 2018 अखेर देशात 32 कोटी 16 लाख 99 हजार बँक खाती उघडण्यात आली आहेत. या बँक खात्यात आजअखेर 80 हजार 93 कोटी रुपयांच्या ठेवी जमा करण्यात आल्या आहेत.
गेल्या 7 महिन्यात महाराष्ट्रात 7 लाख नवीन बँक खाती
महाराष्ट्रात जानेवारी ते जुलै 2018 या सात महिन्याच्या कालावधीत दरमहा 1 लाख नवीन बँक खाती उघडण्यात आली आहेत. डिसेंबर 2017 अखेर महाराष्ट्रात 2 कोटी 17 लाख जन धन बँक खाती उघडण्यात आली होती, जुलै अखेर बँक खात्यांची संख्या 2 कोटी 24 लाखाहून अधिक झाली आहे. या सात महिन्यात 690 कोटीच्या ठेवी जमा झाल्या आहेत.
ग्रामीण बँकांत 1 कोटीहून अधिक बँक खाती
महाराष्ट्रातील एकूण जनधन बँक खात्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत असून ग्रामीण व निमशहरी बँकांमध्ये 1 कोटी 8 लाख 69 हजार 215 बँक खाती उघडली गेली असून शहरी व महानगरातील बँकांमध्ये 1 कोटी 15 लाख 76 हजार 493 बँक खाती उघडली आहेत.
महाराष्ट्रात दीड कोटी ‘रूपे कार्ड’ चे वितरण
देशातील 24 कोटी 20 लाख लाभार्थ्यांना रुपे कार्डचे वितरण करण्यात आले असून महाराष्ट्रात जुलै 2018 अखेर 1 कोटी 56 लाख 74 हजार 250 रुपे कार्ड वितरित झाले आहेत, गेल्या सात महिन्यात 5 लाखाहून अधिक रूपे कार्डचे वितरण महाराष्ट्रात झाले आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai