Breaking News
नवी मुंबई ः भाजीपाल्यासाठी पुरक पाऊस झाल्याने भाजीपाल्याचे उत्पादन चांगले झाले आहे. परिणामी, मुंबई कृषी उत्त्पन्न बाजार समितीमध्ये नेहमी होणार्या 500-550 गाड्यांच्या जागी सध्या दररोज 600 ते 650 गाड्यांची आवक होत आहे. गुरुवारी भाजीपाल्याच्या 725 गाड्यांची आवक झाली. त्यामुळे भाज्यीपाल्याचे दर घाऊक बाजारात 40 टक्क्यांपर्यंत खाली आले. किरकोळ बाजारातही भाज्या स्वस्त झाल्या आहेत.
60 ते 80 रुपये किलो असलेला भाजीपाला आता 40 रुपये किलो दराने उपलब्ध झाला आहे. पुढील महिनाभर तरी भाज्यांचे दर असेच राहतील, अशी माहिती व्यापार्यांनी दिली आहे. सध्या बाजारात राज्याच्या विविध भागांतून भाजीपाला मुंबई बाजारात येत आहे. त्याचबरोबर गुजरात, राजस्थान, उत्तर प्रदेश, कर्नाटक या राज्यांतूनही मोठ्या प्रमाणात भाजीपाला दाखल होत आहे. शिवाय थेट मुंबईत जाणार्या गाड्यांची संख्याही मोठी आहे. भाजीपाल्याच्या गाड्या थेट मुंबईत जात असल्याने मुंबईतून नवी मुंबईतील बाजारपेठेत खरेदीसाठी येणार्या व्यापार्यांची संख्या घटली आहे. त्यामुळे बाजारात माल जास्त, मात्र खरेदीदार कमी असे चित्र सध्या पहायला मिळत आहे. त्यामुळेही मालाचे दर खाली आले आहेत.
घाऊक बाजारात भेंडी 16 ते 18 रुपये किलो झाली आहेत. फरसबी 20 ते 24 रुपये किलो, फ्लॉवर 10 ते 14 रुपये किलो, शेवगा 24 ते 26 रुपये किलो, लवंगी मिरची 28 ते 20 रुपये किलो झाली आहे. टोमॅटो चार ते आठ रुपये किलो, कोबी सहा ते आठ रुपये किलो, लाल भोपळा चार ते आठ रुपये किलो झाला आहे.
एपीएमसीमध्ये गुरुवारी भाजीपाल्याच्या सातशे गाड्यांची आवक झाल्याने भाज्यांचे दर घसरले आहेत. सध्या एपीएमसीत राज्यभरातून भाजीपाला येत आहे. तसेच शेजारील राज्यातूनही आवक होत आहे. त्यामुळे मालाचे दर घसरले आहेत. नेहमीच्या मागणीपेक्षा अधिक माल बाजारात येत असल्याने त्याचा परिणाम भाज्यांच्या दरावर होऊ लागला आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai