Breaking News
मुंबई : राज्यसभेतील 2 एप्रिल रोजी महाराष्ट्रातील सात जागा रिकाम्या होणार आहेत. त्यात राष्ट्रवादीच्या 2, भाजप 2, तर काँग्रेस, शिवसेना आणि अपक्ष प्रत्येकी 1 अशा जागांचा समावेश आहे. यामध्ये शरद पवार, रामदास आठवले, माजिद मेमन, अमर साबळे, हुसेन दलवाई, राजकुमार धूत आणि संजय काकडे या खासदारांचा कार्यकाळ संपत आहे. संख्याबळानुसार सातव्या जागेसाठी शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये रस्सीखेच सुरु आहे.
सध्याच्या संख्याबळानुसार भाजपच्या तीन जागा निवडून येतील अशी स्थिती आहे. तर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेची प्रत्येकी एक जागा निवडून येऊ शकते. मात्र, चौथी जागा हाती लागावी यासाठी शरद पवार आग्रही असल्याचं कळतंय. त्यासाठी शिवसेनेनं सर्वानुमते एक उमेदवार द्यावा अशी भूमिका घेतली आहे. सातव्या जागेसाठी दोनही पक्षाचे प्रमुख आपली ताकद लावत असून अनेक तडजोडी करत आहे. कारण दोन्ही पक्षांना आपलं केंद्रातलं स्थान अधिक मजबूत करायचंय त्यामुळे या सातव्या जागेसाठी शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये रस्सीखेच सुरु झाली आहे.
महाराष्ट्रात राज्यसभेच्या एकूण 19 जागा आहेत. महाराष्ट्रातील 288 आमदारांपैकी एका राज्यसभेच्या खासदाराच्या नियुक्तीसाठी 37 आमदारांच्या पाठिंब्याची गरज असते. सध्याचं विधानसभेचं चित्र पाहिलं तर, भाजपचे 105 खासदार आहेत. त्या आधारावर भाजप तीन खासदार राज्यसभेवर पाठवू शकतात. सध्या शिवसेनेचे 56 (एका खासदाराला 37 मतं, उरली 19 मतं), राष्ट्रवादी काँग्रेस 54 (एका खासदाराला 37 मतं, उरली 17 मतं) आणि काँग्रेसचे 44 (एका खासदाराला 37 मतं, उरली 7 मतं ) आहे. ही आकडेवारी पाहिली तर लक्षात येईल की सातवा खासदार निवडण्यासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादीला एकमेकांची गरज आहे पण कोण कोणाची गरज भागवणार? यावर प्रश्नचिन्ह आहे सातवी जागा ज्याला कोणाला मिळेल त्याला एका जागेसाठी राज्यात मित्रपक्षासोबत महत्त्वाच्या वाटाघाटी कराव्या लागतील. केंद्रातलं स्थान भक्कम बनवण्यासाठी दोन्ही पक्ष या तडजोडीसाठी तयार असल्याचे कळतं आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai