Breaking News
गाळ साफसफाईचा प्रस्ताव तयार ; महाराष्ट्र कोस्टल झोन व्यवस्थापनाच्या मंजुरीची प्रतिक्षा
नवी मुंबई ः होल्डिंग पाँडच्या साफसफाई अभावी पावसाचे पाणी तुंबून पुरजन्य परिस्थिती निर्माण झाल्याचा अनुभव नुकत्याच झालेल्या पावसामध्ये आला. आ.गणेश नाईक यांनी होल्डिंग पाँडचा मुद्दा उपस्थित करून त्यांच्या साफ सफाईची आवश्यकता विषद केली होती. सोमवारी महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या समवेत झालेल्या कोरोना प्रतिबंधात्मक आढावा बैठकीमध्ये त्यावर खुलासा करताना आयुक्तांनी शहरातील सर्व होल्डिंग पाँडच्या गाळ साफसफाईचा एक प्रस्ताव तयार करून तो महाराष्ट्र कोस्टल झोन व्यवस्थापन प्राधिकरणाकडे मंजुरीसाठी पाठवणार असल्याची माहिती दिली. त्यामुळे आता लवकरच होल्डिंग पाँडच्या साफसफाईचा मार्ग मोकळा होणार आहे.
सप्टेंबर 2020 मध्ये शहरामध्ये झालेल्या अतिवृष्टीमध्ये बेलापूरचा बहुतांश भाग पाण्यात बुडाला होता. सुमारे 800 घरे आणि दुकानांमध्ये पावसाचे पाणी शिरले होते. यामुळे नागरिकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले होते. होल्डिंग पाँडची साफसफाई न झाल्याने अनेक वर्षांचा गाळ त्यात साचून राहिला आहे. त्यामुळे पाण्याचा निचरा होत नसल्याने पुरजन्य परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभुमीवर आ. गणेश नाईक यांनी होल्डिंग पाँडच्या साफसफाई करण्याची गरज असल्याचे पालिकेला सांगितले होते. सोमवारी महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या समवेत झालेल्या बैठकीमध्ये आमदार नाईक यांनी हा विषय पुन्हा एकदा उपस्थित केला. त्यावर खुलासा करताना आयुक्तांनी शहरातील सर्व होल्डिंग पाँडच्या गाळ साफसफाईचा एक प्रस्ताव तयार करून तो महाराष्ट्र कोस्टल झोन व्यवस्थापन प्राधिकरनाकडे या उच्च न्यायालयाने मान्यता दिलेल्या अधिकृत प्राधिकरणाकडे मंजुरीसाठी पाठवणार असल्याची माहिती दिली. तसेच होल्डिंग पाँडच्या बाबतीत उच्च न्यायालयामध्ये दाखल करण्यात आलेली जनहित याचिका निकाली काढण्यात आली असल्याचे नमुद केले. या बैठकीस माजी खासदार डॉ संजीव नाईक, माजी आमदार संदीप नाईक, माजी महापौर सागर नाईक, माजी महापौर जयवंत सुतार, भाजपाचे जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत व इतर माजी लोकप्रतिनिधी, पदाधिकारी उपस्थित होते.
खाजगी डॉक्टरांना सुरक्षा कवच प्रदान करा
कोरोना काळात नागरिकांना वैद्यकीय सेवा देणारे खाजगी डॉक्टर हेदेखील कोरोना योद्धे आहेत. नवी मुंबईतील तीन डॉक्टरांचा करोना संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. त्यांच्या कुटुंबीयांना महापालिकेमार्फत आर्थिक मदत मिळाली पाहिजे आणि आणि खाजगी डॉक्टरांना देखील विम्याचे सुरक्षाकवच मिळायला पाहिजे अशी आग्रही मागणी आ.नाईक यांनी केली. या मागणीला आयुक्त बांगर यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.
मास्क न वापरल्यास जादा दंड आकारा
बहुसंख्य नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी जी मोजकी मंडळी मास्क परिधान करीत नाहीत त्यांच्याकडून वाढीव दंड आकारावा एमआयडीसी आणि एपीएमसी मध्ये परप्रांतीय मजुरांची अँटीजन टेस्ट करावी, अशा सूचना केल्या.
सणासुदीच्या दिवसात अधिक सतर्क रहा
नवी मुंबईतील कोरोनाची आकडेवारी आता स्थिरावली असली तरी सणासुदीचे दिवस पाहता सण साजरा करण्याच्या उत्साहात खबरदारी पाळली जात नाही. परिणामी कोरोनाचा संसर्ग वाढतो. पुन्हा कोरोना वाढीसारख्या संकटाचा पुन्हा सामना करावा लागू नये, यासाठी सतर्क राहण्याचे निर्देश प्रशासकीय यंञणांना द्यावेत, असा सल्ला आमदार नाईक यांनी आयुक्तांना दिला.
उद्यानांची देखभाल करावी
देखभालीअभावी शहरातील सर्वच उद्यानांची दुरावस्था झाल्याची बाब माजी नगरसेवक रविंद्र इथापे यांनी बैठकीत मांडली. लोकनेते आ.नाईक यांनी या प्रकरणात जी काही चौकशी सुरु आहे ती पूर्ण करावी. माञ उद्यानांची योग्य प्रकारे देखभाल करावी, जेणेकरन नागरिकांची गैरसोय होणार नाही, अशी सुचना त्यांनी आयुक्तांना केली. उद्यानांचा गैरवापर होवू नये यासाठी सुरक्षा रक्षक नेमण्यात येतील, असे आश्वासन देत उद्यानांच्या देखभालीकडे गांभीर्याने लक्ष देण्याची ग्वाही आयुक्तांनी यावेळी दिली.
कन्डोमिनियम वसाहती अंतर्गत कामे सुरु करावित
सिडकोने बांधलेल्या कन्डोमिनियम वसाहतीमधून सर्व सामान्य नागरिक राहतात या वसाहती अंतर्गत मलनिसारनाची कामे पालिकेने करावीत अशी मागणी आमदार नाईक यांनी केली. माजी आमदार संदीप नाईक यांनी शासन दरबारी पाठपुरावा करून या कामाना मंजुरी घेतली होती. मात्र ही कामे पालिकेकडून करण्यात आली नाहीत. मलनिसारन वाहिन्या जीर्ण झाल्याने त्या फुटतात. त्यामधून परिसरात दुर्गंधी पसरते आणि परिणामी रोगांना आमंत्रण मिळते. या मागणीच्या अनुषंगाने कार्यवाही करण्यास आयुक्त बांगर यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai