Breaking News
पनवेल ः खारघर-तळोजा-पनवेल पट्ट्यातील हवेतील प्रदूषण तिप्पटीने वाढल्याचे एका सर्वेक्षणातून समोर आले आहे. वातावरण फाऊंडेशन या पर्यावरण संस्थेने गेल्या महिनाभर केलेल्या हवेच्या गुणवत्तेत प्रदूषण पातळी चक्क 60 पीएमवरुन 200 पीएमवर पोहोचली आहे. हवेतील प्रदूषण पातळी प्रमाणाच्या बाहेर वाढल्याने याचा परिणाम तुमच्या शरीरावर होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे सकाळच्या वेळेत ही पातळी खालावलेल्या असल्याने मॉर्निंग वॉकसुद्धा नुकसान दायक ठरु शकते.
मुंबईलगतच्या भागातून म्हणजेच रायगड, पालघर, नवी मुंबई, ठाणे कल्याण डोंबिवली परिसरात हवेतील प्रदुषणात वाढ झाल्याचे नुकतेच समोर आले होते. आता पनवेल-खारघर, तळोजा परिसरात हवेतील गुणवत्ता खालावून प्रदुषण वाढल्याचे एका सर्वेक्षणात उघड झाले आहे. तळोजा एमआयडीसीमधील कंपन्यांमधून हवेत सोडले जाणारे विषारी गॅस, सुरु असलेलं नवीन बांधकाम, हायवेवरुन जाणार्या वाहनांमधून निघणारा धूर आदी करणांमुळे प्रदूषणाची पातळी धोक्याच्या वर जाऊन पोहोचली आहे. पर्यावरणावर काम करणार्या वातावरण फाऊंडेशनने एक महिनाभर हवेची गुणवत्ता तपासण्यासाठी एअर क्वॉलिटी मॉनिटर मशीन बसवल्या होत्या. 13 नोव्हेंबर ते 13 डिसेंबरपर्यंत हवेची गुणवत्ता तपासण्यात आली. पनवेल, तळोजा एमआयडीसी, नावडे, खारघर सेक्टर 36, खारघर सेक्टर 7 या पाच ठिकाणी बसवलेल्या या मशीनमध्ये हवेची गुणवत्ता रोज तपासली असता धक्कादायक माहिती समोर आली आहे. सलग महिनाभर तपासलेल्या हवेच्या गुणवत्तेत चक्क 200 पीएमपर्यंत प्रदूषणाची पातळी नोंदवली गेली आहे. अभ्यासातून समोर आलेल्या माहितीनुसार पीएम 2.5 ची सर्वाधिक पातळी 141.1 मायक्रोग्रॅम प्रतिघनमीटर (पाच उपकरणांच्या आकडेवारीची सरासरी) सकाळी सात वाजता नोंदली गेली. जरी पीएम 2.5 ची सर्वाधिक पातळी सकाळच्या काही तासांत नोंदली गेली असली तरी दिवसातील 17 तास इथले रहिवासी प्रदूषित हवेत श्वास घेत होते.
‘वातावरण’ या अभ्यासाचा विस्तृत अहवाल पनवेल महानगरपालिकेच्या आयुक्तांना, लोकप्रतिनिधी आमदार प्रशांत ठाकूर साहेब तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला सादर करणार आहे. दरम्यान अधिकार्यांना त्यांनी काही शिफारशी केल्या आहेत.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai