Breaking News
गवते कुटुंबाचा गणेश बंधनाला रामराम
नवी मुंबई : राज्यात कोरोनाची लाट आता ओसरु लागल्याने महापालिकेच्या निवडणुकीची चाहुल लागताच पक्षांतराची लाट आता नवी मुंबईत धडक देऊ लागली आहे. अनेक महिने दाबून ठेवलेल्या राजकीय महत्वाकांक्षेला नगरसेवकांनी आता वाट मोकळी करुन दिली आहे. दिघा विभागातील गवते कुंटुंबियांनी गणेश बंधनाला रामराम ठोकून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत हाती शिवबंधन बांधले आहे. त्यामुळे नवी मुंबईतील या बंडखोरीच्या त्सुनामीचा तडाखा अजून किती राजकीय पक्षांना बसतो ते पाहणे औत्युक्याचे ठरणार आहे.
4000 कोटीचा अर्थसंकल्प असलेल्या नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. 1995 पासून या महापालिकेवर एकहाती वर्चस्व ठेवणार्या माजी मंत्री गणेश नाईक यांची कसोटी यावेळी या निवडणुकीत लागणार आहे. शिवसेनेपासून आपली राजकीय कारकिर्द सुरु करणार्या गणेश नाईक यांनी 1998 साली शिवसेनेला रामराम ठोकून नवी मुंबई विकास आघाडीचा झेंडा पालिकेवर फडकवला. त्यानंतर 2000 साली राष्ट्रवादीत प्रवेश करुन 2019 सालापर्यंत राष्ट्रवादीची सत्ता महापालिकेवर कायम ठेवली. राज्यातील भाजपचे वाढते वर्चस्व बघुन 2019 मध्ये नाईकांनी आपल्या 42 समर्थक नगरसेवकांसह भाजपात प्रवेश केला आणि ऐरोली विधानसभेतून ते आमदार म्हणून निवडुन आले. 2019 साली राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्याने नाईकांनी केलेल्या या राजकीय खेळीचे गणित चुकले आणि त्याचा फटका त्यांना नर्वी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आधीच शिवसेना सोडून गेल्याने ठाकरेंसह नवी मुंबईतील शिवसैनिक नाराज होते त्यातच त्यांनी राष्ट्रवादी सोडून भाजपला जवळ केल्याने अजित पवार यांनी त्यांना धडा शिकवण्याचा निश्चय केल्याचे बोलले जात आहे. अजित पवार यांनी ही जबाबदारी जितेंद्र आव्हाड यांच्याकडे तर शिवसेनेने एकनाथ शिंदे यांना हे शिवधनुष्य पेलण्यास सांगितले आहे. गेल्यावर्षी सुरेश कुलकर्णी यांनी चार नगरसेवकांसह नाईकांसोबतचे संबंध तोडून शिवसेनेला जवळ केले. मध्यंतरी कोरोना संक्रमणामुळे मंदावलेली राजकीय गणिते कोरोनाची लाट ओसरु लागल्याने पुन्हा जुळवण्यास सर्वच पक्षांनी सुरुवात केली आहे. मंगळवारी नवीन गवेत यांनी अपर्णा व दिपा गवतेंसोबत मातोश्रीवर जाऊन शिवबंधन बांधले. या घटनेनंतर बंडखोरीच्या चर्चेला उधाण आले असून अजून 14 नगरसेवक पक्षांतर करणार असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरु आहे. यामध्ये तुर्भ्यातील पाटील कुटुंबियांचे नाव चर्चेत असून त्यांचे राष्ट्रवादीशी घनिष्ट संबंध असल्याने ते घरवापसी करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नेरुळ, घणसोली व कोपरखैरणे या ठिकाणी राष्ट्रवादी व शिवसेनेचा जोर असल्याने येथील नगरसेवक भाजपला रामराम ठोकण्याची शक्यता आहे. काही महिन्यांपुर्वी काँग्रेसला रामराम करुन भाजपात प्रवेश केलेले दशरत भगत कुटुंबिय त्यांच्या निर्णयाचा फेरविचार करणार असल्याचे बोलले जात आहे.
बंडखोरीचा फटका फक्त भाजपलाच बसणार नसून महाविकास आघाडीत तिकीट न मिळाल्यास मोठ्या प्रमाणावर त्यांनाही बसणार असल्याचे बोलले जात आहे. नवी मुंबईचे राजकीय चाणक्य म्हणून ओळखले जाणारे गणेश नाईक हे महाविकास आघाडीतील बंडखोरांशी संपर्कात असून त्यांना यापुर्वीच त्यांनी रसद पोहचविली आहे. त्यातच कोरोना काळात नवी मुंबईत त्यांनी केलेले काम, त्यांचा दांडगा जनसंपर्क व भाजपचा सुनियोजित प्रचार यावर त्यांची भिस्त आहे. सर्वजण महापालिकेच्या निवडणुकीच्या कार्यक्रम पत्रिकेची वाट पाहत असून त्यानंतरच बंडखोरीची खरी त्सुनामी पाहायला मिळेल व त्यात तग धरणार्यांनाच पालिकेवर सत्ता मिळवता येईल असे राजकीय तज्ञांचे मत आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai