Breaking News
40 टक्के वीज ग्राहकांनी बिल भरण्याकडे पाठ
पनवेल ः पनवेल आणि उरण तालुक्यात करोनाच्या कालावधीत वीज ग्राहकांनी बिले न भरल्यामुळे थकबाकीचा आकडा तब्बल 116 कोटी रुपयांवर गेला आहे. ही थकबाकी वसूल करण्याचे मोठे आव्हान पनवेल शहर विभागीय कार्यालयापुढे उभे राहिले आहे.
महावितरणच्या पनवेल शहर विभागीय कार्यालयांतर्गत कळंबोली, खारघर, पनवेल शहर, पनवेल 1 आणि उरण असे पाच उपविभाग येतात. पनवेल तालुक्यातील शहरी आणि ग्रामीण भागात महावितरणचे लाखो ग्राहक आहेत. करोनाच्या काळात महावितरणने सक्तीची वसुलीदेखील बंद केली. त्यामुळे महावितरणच्या थकबाकीचा आकडा वाढत गेला. रहिवासी, व्यावसायिक, औद्योगिक, सार्वजनिक पाणीपुरवठा, पथदिवे, शासकीय कार्यालये आणि शेतीपंप आदींना महावितरण वीजपुरवठा करते. करोनानंतर नागरिकांना वेगवेगळ्या प्रकारची सवलत देऊनही नागरिकांनी वीज बिले न भरल्यामुळे ही थकबाकी वाढत गेली आणि पनवेल शहर विभागीय कार्यालयाच्या अंतर्गत येणार्या पाच उपविभागांत थकबाकीचा आकडा 116 कोटी 72 लाख रुपयांवर गेला आहे. ही आकडेवारी पाहता 40 टक्के वीज ग्राहकांनी बिल भरण्याकडे पाठ फिरवल्याचे स्पष्ट झाले आहे.
पनवेल शहर विभागीय कार्यालयात लॉकडाउनपूर्वी दरमहा उपविभागीय कार्यालयांमधून वीजबिलापोटी 70 ते 80 कोटी रुपये उत्पन्न अपेक्षित असताना सरासरी 15 ते 20 कोटी रुपयांची तफावत राहात होती. करोनानंतर ही परिस्थिती बदलली असून पाच कार्यालयांमधून दररोज फक्त दीड ते दोन कोटी रुपये वसूल होत होते. बिल न भरल्यास वीजपुरवठा खंडित करण्याचा इशारा महावितरणने दिल्यानंतर बुधवारी पहिल्याच दिवशी 6 कोटींची वसुली झाली होती.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai