Breaking News
नवी मुंबई : खारघर, कळंबोली, तळोजा, पनवेल या दक्षिण नवी मुंबईत वाढलेल्या प्रदूषणाची चौकशी राज्य प्रदूषण मंडळ करणार असून रात्रीच्या वेळी मंडळाचे दक्षता पथक पाहणी करणार आहे. कळंबोली येथील नागरिकाने केलेल्या प्रदूषणाच्या तक्रारीनंतर मंडळाने हे आश्वासन दिले असून दोषी कारखान्यांवर कारवाई केली जाईल, असे स्पष्ट केले आहे.
तळोजा एमआयडीसीतील रासायनिक कारखान्यांचा या प्रदूषणात जास्त हातभार लागत आहे. येथील तीन कारखान्यांना प्रदूषणाच्या कारणास्तव नोटिसा देण्यात आल्या असून खारघरमधील दगडखाणींनाही समज देण्यात आली आहे. येथील वाढत्या प्रदूषणाची तक्रार खारघर येथील वातावरण संस्थेने एका अहवालानुसार केली असून त्याचे गांभीर्य पनवेल पालिका अथवा सिडकोने घेतलेले नाही. त्यामुळे या संस्थेने बिलीबोर्डद्वारे कृत्रिम फुप्फुसे उत्सव चौकात ठेवली होती. मात्र प्रदूषणामुळेही फुप्फुसे दहा दिवसांत काळी पडली. खारघरमध्ये सकाळी प्रभातफेरीला जाणे त्रासदायक झाले असून 17 तास येथील नागरिक प्रदूषणकारी हवेत श्वास घेत असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. त्यामुळे कळंबोली येथील नागरिक श्रीधर शिरोडकर यांनी प्रदूषण मंडळाला याची गंभीर तक्रार केली असून मंडळाने त्याची दखल घेतली आहे.
येथील प्रदूषणाची पर्यावरणमंत्री अदित्य ठाकरे यांच्याकडे तक्रार केली मात्र त्यांच्या विभागाने याची दखल घेतली नाही. त्यामुळे अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे प्रदूषणाची अहवालासह तक्रार करण्यात आली आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai