Breaking News
समाजकल्याण विभागातील अधिकारी कर्मचार्याकडून कर्मचारी दिनाचे स्वागत
नवी मुंबई : लोकशाही दिनाच्या धर्तीवर राज्याच्या समाजकल्याण विभागात आता कर्मचारी दिन आयोजित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय समाजकल्याण विभागाच्या वतीने घेण्यात आला आहे. समाजकल्याण विभागाचे आयुक्त डॉ.प्रशांत नारनवरे यांच्या संकल्पनेतून कर्मचारी दिन आयोजित करण्यात येत असून शासनात प्रथमच अशा प्रकारचा उपक्रम समाजकल्याण विभागाच्या वतीने राबविण्यात येत आहे. सदर कर्मचारी दिनाचे समाजकल्याण विभागाच्या सर्व अधिकारी कर्मचारी वर्गाकडून स्वागत करण्यात येत आहे.
विभागातील अधिकारी व कर्मचारी हे विविध प्रकारच्या योजना अंमलबजावणीचे काम करत असतात त्यासाठी त्यांना आवश्यक ते प्रशिक्षण दिले जाते. सर्व अधिकारी व कर्मचारी त्यांच्या परीने योजना राबविण्याचा प्रयत्न करीत असतात. मात्र कामाच्या व्यापात अधिकारी व कर्मचारी यांचे सेवाविषयक प्रश्नाकडे दुर्लक्ष होते. त्यातून प्रश्न सुटत नसल्याने अधिकारी व कर्मचारी हे चिंतेत व तणावाखाली काम करीत असतात. याचा परिणाम प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर व गतिमानतेवर होत असल्यामुळे अधिकारी व कर्मचारी यांचे सेवा विषयक प्रश्न वेळेवर विशिष्ट कालमर्यादेत सुटणे आवश्यक आहे. त्यासाठी विभागातील अधिकारी व कर्मचारी यांच्याशी संवाद साधण्यासाठी व त्यांचे सेवा विषयक समस्या सोडविण्यासाठी कर्मचारी दिन आयोजित करण्याबाबत आयुक्तालयाने निर्णय घेतला आहे.
याबाबत राज्यातील सर्व कार्यालयांना परिपत्रक पाठवून याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. जिल्हा व प्रादेशिक स्तरावर दर महिन्याच्या पहिल्या गुरुवारी, तसेच प्रादेशिक स्तरावरील सर्व कार्यालयांसाठी एकत्रित दोन महिन्यातून एकदा, दुसऱया गुरुवारी तर राज्यस्तरीय आयुक्तालय स्तरावर तीन महिन्यातून एकदा, तिसऱया गुरुवारी याप्रमाणे कर्मचारी दिन आयोजित करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. राज्यातील सहाय्यक आयुक्त कार्यालय, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती व जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद कार्यालयातील कर्मचारी यांना त्यांचे प्रश्न जिल्हा किंवा विभागीय स्तरावरील कर्मचारी दिनात उपस्थित करता येणार आहेत. कर्मचारी दिनामध्ये सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी व कर्मचारी यांच्या तक्रारींचा सुद्धा विचार करण्यात येणार आहे. सदर कर्मचारी दिनामध्ये सेवाविषयक बाबींचा प्रामुख्याने विचार करण्यात येणार आहे यामध्ये अग्रीम, वैद्यकीय प्रतिपूर्ती देयके, गोपनीय अहवाल, पदोन्नती, मानीव दिनांक, शिस्तभंग विषयक प्रकरणे, सेवानिवृत्ती प्रकरणे, रजा विषयक प्रकरणे, इत्यादी विषय हाताळले जाणार आहेत. पहिल्या कर्मचारी दिनी उपस्थित झालेल्या तक्रारींचे उत्तर दुसऱया कर्मचारी दिनापूर्वी संबंधित अधिकारी व कर्मचाऱयास देणे बंधनकारक करण्यात आले आहे. कर्मचाऱयांचा प्रश्न आयुक्तालयस्तर किंवा शासनस्तरावर असला तरी त्या संबंधाची निवेदने स्विकारुन शासनास सादर करण्याचेही परिपत्रकाद्वारे सूचित करण्यात आले आहे.
कर्मचारी दिनी प्रत्यक्ष उपस्थित न राहता व्हिडिओ कॉन्फरन्सने देखील सहभागी होता येणार आहे. सदर कर्मचारी दिनाचे समाजकल्याण विभागाच्या सर्व अधिकारी कर्मचारी वर्गाकडून स्वागत करण्यात येत आहे. कर्मचारी दिनानिम्मित कर्माचार्यांचे प्रश्न सुट्ण्यास मदत होणार असल्याने त्याच्या परिणाम कामकाजावर होणार आहे. शासनात प्रथमच अशाप्रकारचा उपक्रम समाज कल्याण विभागात होत आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai