Breaking News
भारतातील बंदर आधारित औद्योगिकीकरणाचे होणार सक्षमीकरण
उरण : जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी) हे भारतातील एक प्रमुख कंटेनर पोर्ट आहे. 2 ते 4 मार्च, 2021 दरम्यान ऑनलाईन पद्धतीने होणार्या मेरीटाइम इंडिया समिट 2021 च्या पार्श्वभूमीवर जेएनपीटीने बुधवारी बंदर प्रकल्प, तंत्रज्ञान हस्तांतरण आणि जेएनपीटी सेझमधील भूखंडांच्या विकासासाठी संभाव्य गुंतवणूकदारांशी 27000 कोटी रुपयांचे 30 सामंजस्य करारावर स्वाक्ष-या केल्या. जेएनपीटीचे अध्यक्ष संजय सेठी यांनी करारांवर स्वाक्षर्या केल्या. यावेळी जेएनपीटीचे उपाध्यक्ष उन्मेष वाघ उपस्थितीत होते.
सामंजस्यकरारांवर स्वाक्षर्या करणार्या प्रमुख कंपन्यांमध्ये डीपी वर्ल्ड, जेएम बक्शी अँड कंपनी, गणेश बेंझो, बीपीसीएल, एनआईटीआईई, एसएस जी फार्मा प्रा. लि., सूरज अॅग्रो,जेडब्ल्यूआर लॉजिस्टिक प्रा. लि., सिनलाइन इंडिया लिमिटेड चा समावेश असून त्यांनी मॅन्युफॅक्चरिंग, आयटी सर्व्हिसेस, वेअरहाउसिंग / कोल्ड स्टोरेज, एफटीडब्ल्यूझेड, फार्मा, कन्फेक्शनरी मॅन्युफॅक्चरिंग, अभियांत्रिकी सेवा, फूड प्रोसेसिंग संबंधी सामंजस्य करार केले आहेत. याप्रसंगी बोलताना जे.एन.पी.टी. चे अध्यक्ष संजय सेठी म्हणाले, जेएनपीटी संपूर्ण जगभरात बंदर उद्योगासाठी दर्जेदार सेवेचा बेंचमार्क स्थापित करण्यासाठी समर्पित असून आम्ही निरंतर व्यापार वाढीचा मार्ग प्रशस्त करण्याच्या उद्देशने बंदरातील कार्यक्षमता व वाहतूक हाताळणीक्षमतेमध्ये वाढ करण्यासाठी नियोजनबद्धरित्या गुंतवणूक केली आहे. ‘मेरीटाइम इंडिया समिट’ मध्ये आम्ही विविध कंपन्यांसमवेत 30 सामंजस्य करारांवर स्वाक्षर्या केल्या आहेत. यामुळे जेएनपीटीला देशातील गुंतवणूकीचे महत्त्वाचे केंद्र म्हणून स्थापित करण्यास मदत होणार आहे. कारण जगभरात कोविड-19 चा परिणाम झाल्यानंतरही जेएनपीटी गुंतवणूकीचे आकर्षक केंद्र म्हणून कायम राहिले आहे. या कठीण काळातही जेएनपीटी मध्ये रु. 27000 कोटींची नवीन गुंतवणूक झाली आहे. हे सामंजस्य करार केल्याने रोजगाराच्या विपुल संधी निर्माण होतील व आयात-निर्यात व्यापारास याचे विविध लाभ होतील. याव्यतिरिक्त, या करारांमुळे भारत आणि आंतरराष्ट्रीय किनारपट्टीवरील व्यापाराच्या विविध संधी खुल्या होतील.
भारतीय बंदरे आणि सागरी क्षेत्रातील देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय गुंतवणूकीस चालना देण्यासाठी केंद्रीय बंदरे, नौकानयन व जलमार्ग मंत्रालय व फिक्की (एफआयसीसीआय) औद्योगिक भागीदार व ईवाय ज्ञान भागीदार यांच्या संयुक्त विद्यमाने मार्च 2021 मध्ये ‘मेरीटाइम इंडिया समिट 2021’ या सम्मेलनाचे आयोजन करण्यात येत आहे. 2 ते 4 मार्च,2021 दरम्यान आभासी (ऑनलाइन) पद्धतीने आयोजित करण्यात येणार्या या सम्मेलनात 3 दिवसीय शिखर सम्मेलन व प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘एमआयएस 2021’चे उद्घाटन करण्यात येणार असून केन्द्रीय बंदरे, नौकानयन आणि जलमार्ग राज्यमंत्री मनसुख मंडावीया यांचे स्वागतपर भाषण होणार आहे. या सम्मेलनात 24 सहयोगी देश सहभागी होतील आणि 400 हून अधिक प्रकल्पांचे प्रदर्शन या ठिकाणी करण्यात येणार आहे.
जेएनपीटीचे अध्यक्ष संजय सेठी हे पहिल्या सत्राचे-‘जागतिक दर्जाच्या बंदरांचा विकास’- संयोजक असतील. या सत्रामध्ये ते जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधांसह मोठ्या बंदरांचा विकास,सुगम व्यापारासाठी स्मार्ट बंदरे विकसित करण्याचे महत्व व बंदरे आणि टर्मिनल्सच्या डिजिटलायझेशनचा प्रभाव - एआय, आयओटी, 5 जी टेक्नोलॉजीमुळे होणारे बदल, नवीन मॉडेल : पीपीपी आणि लँडलॉर्ड मॉडेल यावर ते भर देतील. त्याचबरोबर जेएनपीटीचे उपाध्यक्ष उन्मेश शरद वाघ हे ‘महाराष्ट्रातील गुंतवणूकीच्या संधी’या विषयावरील विशेष सत्राचे संयोजक असतील. यामध्ये ते जेएनपीटी सेझमधील गुंतवणूकीच्या संधींवर प्रकाश टाकतील.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai