Breaking News
आमदार गणेश नाईक यांची मागणी ; सध्या 40 टक्के कमी कोविड लसपुरवठा
नवी मुंबई ः महाविकास आघाडी सरकारकडून नवी मुंबई महापालिकेला पुन्हा एकदा दुजाभावाची वाागणूक दिली जात असल्याचा प्रकार उघडकीस आला असून नवी मुंबई शहराच्या लोकसंख्येच्या प्रमाणात 30 ते 40 टक्के कमी कोरोना लसीचा पुरवठा करण्यात येतो आहे. आमदार गणेश नाईक यांनी या गंभीर विषयाची तात्काळ दखल घेत 2 एप्रिल 2021 रोजी राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आरोग्यमंत्री, विधानसभेचे विरोधीपक्षनेते,विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते, राज्याचे मुख्य सचिव या सर्वांना लेखी निवेदने देवून नवी मुंबईला लोकसंख्येच्या प्रमाणात 100 टक्के लसपुरवठा करण्याची मागणी केली आहे.
यापूर्वी कोरोना नियंत्रण उपायोजनांसाठी एमएमआर क्षेत्रात राज्य सरकारच्या वतीने देण्यात आलेल्या निधीचा अत्यंत अल्प वाटा नवी मुंबईच्या पदरात पडला होता. सुमारे 1200 कोटी रूपये कोरोना नियंत्रणासाठी एमएमआर क्षेत्रात खर्च करण्यात आल्याचे सरकारच्या वतीने सांगण्यात आले होते मात्र राज्य शासनाच्या वतीने नवी मुंबई महापालिकेला फक्त 10 कोटी 40 लाख रूपये इतका नगण्य निधी जाणिवपूर्वक देण्यात आला होता. महापालिकेने कोरोना नियंत्रणासाठी 250 कोटी रूपयांचा प्रस्ताव राज्य शासनास सादर करून देखील अद्याप त्याची पुर्तता करण्यात आलेली नाही. नवी मुंबई शहरात पालिका प्रशासनाच्या वतीने कोरोनाला नियंत्रणात ठेवण्यासाठी अत्यंत प्रभावीपणे उपाययोजना सुरू आहेत. लसीकरणाचा कार्यक्रम वेगाने राबविण्यात येतो आहे. 2 एप्रिल 2021 पर्यंत कोविड योध्दे, वैद्यकीय कर्मचारी, पोलीस, ज्येष्ठ नागरिक अशा विविध श्रेणीतील एक लाखांपेक्षा अधिक नागरिकांना लसीचा पहिला डोस यशस्वीपणे देण्यात आला आहे. 1 एप्रिलपासून 45 वर्षांवरील सर्व नागरिकांना लस देण्यास सुरूवात झाली आहे. त्यालाही उत्साही प्रतिसाद लाभतो आहे. नवी मुंबईत कोरोनाचे आकडे वाढत आहेत. नवी मुंबईतील सर्वच नागरिकांचे 100 टक्के लसीकरण होणे अत्यावश्यक असल्याचे आ.नाईक यांनी म्हंटले आहे. मात्र लोकसंख्येच्या प्रमाणात कोविड लसींचा पुरेसा साठा राज्य सरकारकडून नवी मुंबईला देण्यात हात आखडता घेण्यात आला आहे. त्याचवेळेस ठाणे, कल्याण-डोंबिवली या व अन्य महापालिकांना मात्र त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात पुरेसा लसींचा साठा राज्य सरकारकडून उपलब्ध करून देण्यात आला आहे. कोरोनाच्या आपत्ती काळात अशा प्रकारचा शहरांमध्ये दुजाभाव करणे राज्य सरकारकडून अपेक्षित नाही. नवी मुंबईची लोकसंख्या 15 लाखांच्या घरात आहे. एवढया मोठया लोकसंख्येला पुरेल एवढा कोविड लसींचा साठा राज्य सरकारने नियमितपणे नवी मुंबई महापालिकेला पुरवावा, अशी मागणी आमदार गणेश नाईक यांनी केली आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai