Breaking News
पाच दिवसात रेल्वेने येणार 110 टन द्रवरुप प्राणवायु
मुंबई : महाराष्ट्रासाठी आणि पर्यायाने भारताची पहिली ऑक्सिजन एक्सप्रेस सोमवारी मध्य रेल्वेच्या कळंबोली रेल्वे स्टेशनमधून विशाखापट्टणमसाठी रवाना झाली. या एक्सप्रेसला राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी हिरवा कंदील दाखवला. ही एक्सप्रेस सात टँकरसह विशाखापट्टणमच्या दिशेने रवाना झाली आहे. अंदाजे 24 तासात ही एक्सप्रेस विशाखापट्टणमला पोहोचेल आणि त्यानंतर तिथून लिक्विड मेडिकल ऑक्सिजन घेऊन पुन्हा महाराष्ट्रात येईल. या एक्सप्रेससाठी राज्य सरकारकडून रेल्वेला टँकर्स पुरविण्यात आलेले असून रेल्वे हे रिकामे टँकर घेऊन देशातील विविध शहरांमधून लिक्विड मेडिकल ऑक्सिजन महाराष्ट्राला पुरवणार आहे. येत्या पाच दिवसात एकशे दहा मे. टन द्रवरुप ऑक्सिजनचा पुरवठा रेल्वेवाहतुकीच्या माध्यमातून राज्याला होणार आहे.
गेल्या काही दिवसात महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या प्रचंड वाढली असल्याने ऑक्सिजनची मोठ्या प्रमाणात कमतरता भेडसावत आहे. ही कमतरता भरून काढण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजनांचा वापर करून त्यांची वाहतूक करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी मुख्यमंत्र्यांनी केंद्राला केली होती. त्या मागणीनंतर रेल्वे मंत्रालयाने पुढे येत रो रो सर्विसचा वापर करून महाराष्ट्रात ऑक्सिजन पुरवणार असल्याचे जाहीर केले. त्यानुसार मध्य रेल्वेचे कळंबोली आणि पश्चिम रेल्वेचे बोईसर स्थानक निश्चित करून त्या ठिकाणी रॅम्प बांधण्यात आले आहेत. अशीच सुविधा इतर काही ठिकाणी देखील उभारण्यात येणार असल्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी सांगितले आहे.
या ऑक्सिजन एक्सप्रेस मधून 10 टँकर्स पाठवण्यात येणार होते. मात्र 4 टँकर्सची उंची जास्त असल्याने त्यांना परत पाठवण्यात आले. शेवटी 7 टँकर्स घेऊन ही गाडी निघाली. या गाडीसाठी विशाखापट्टणमपर्यंत ग्रीन कॉरिडॉर निर्माण करण्यात येणार आहे. त्यामुळे गाडीची वाहतूक लवकर होईल. तर ज्यावेळी ही गाडी ऑक्सिजन घेऊन पुन्हा येईल त्यावेळी जास्त गरज असलेल्या ठिकाणी प्रथम, अश्या प्रकारे या ऑक्सिजनचे वाटप करण्यात येईल. त्यासाठी रस्त्यावर देखील ग्रीन कॉरिडॉर निर्माण करण्यात येईल, असे परिवहन मंत्री अनिल परब यांनी सांगितले. ही पहिलीच गाडी असल्याने त्यात ज्या गोष्टी कमी राहतील त्या पुढच्या वेळी भरून काढू असेही ते म्हणाले. तसेच य एक्सप्रेस चालवण्यासाठी खर्च कोणी करायचा याबाबत अजूनही काही चर्चा झाली नसून, माणसांचे जीव महत्त्वाचे आहे, त्यासाठी वेळ आली तर पैसे देखील खर्च करू असे अनिल परब म्हणाले.
या एक्स्प्रेसच्या माध्यमातून येत्या पाच दिवसात एकशे दहा मे. टन द्रवरुप ऑक्सिजनचा पुरवठा रेल्वेवाहतुकीच्या माध्यमातून राज्याला होणार आहे. ऑक्सिजन तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुचवल्याप्रमाणे राज्याच्या प्रशासनाने वेगवेगळे पर्यायांची चाचपणी करत रेल्वे मार्गे ऑक्सिजन वाहतूक करता येईल असे केंद्र शासनाला सुचवले होते. त्यानुसार ही एक्स्प्रेस चालवण्यास रेल्वेने मंजुरी दिली असून यापुढील काळात प्राणवायूच्या निरंतर पुरवठ्यासाठी रेल्वेच्या मदतीने आणखीन ऑक्सिजन एक्स्प्रेस चालविण्याचे नियोजन करण्यात येत आहे. त्यामुळे ऑक्सिजन तुटवड्यावर मात करणे शक्य होणार आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai