Breaking News
नवी मुंबई ः जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या वतीने आयोजित माझी वसुंधरा अभियानामध्ये राज्यातील अमृत शहरांच्या गटात नवी मुंबई महानगरपालिका राज्यात व्दितीय क्रमांकाची मानकरी ठरली. ऑनलाईन पारितोषिक वितरण समारंभात महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे, पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिव मनिषा म्हैसकर यांच्या उपस्थितीत नवी मुंबई महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी हा सन्मान स्विकारला.
भूमी, जल, वायू, अग्नि, आकाश या पंचतत्वांच्या अनुषंगाने प्रत्येक शहराने केलेल्या उल्लेखनीय कामांची नोंद घेत वसुंधरा अभियान राबविण्यात आले असून यामध्ये 43 अमृत शहरे, 222 नगरपरिषदा, 130 नगरपंचायती तसेच 291 ग्रामपंचायती अशा एकूण 686 संस्था सहभागी झाल्या होत्या. 1 जानेवारी 2020 ते 15 एप्रिल 2021 या कालावधीमध्ये वृक्षलागवड, जलसंवर्धन, वायू प्रदूषण नियंत्रण, घनकचरा व्यवस्थापन, ऊर्जा बचत व पर्यावरणविषयक जनजागृती या विविध बाबींमध्ये केलेल्या कामांचे ध्वनीचित्रफित सादरीकरण तसेच वेब लिंकव्दारे प्रत्यक्ष स्थळ पाहणी या माध्यमातून अभियान परीक्षण करण्यात आले. यामध्ये नवी मुंबई महानगरपालिका राज्यातील व्दितीय क्रमांकाची मानकरी ठरली.
पालिकेने केलेल्या नाविन्यपूर्ण बाबी
निसर्गातील पंचतत्वांना अनुसरून नवी मुंबई महानगरपालिकेने केलेल्या विविध नाविन्यपूर्ण कामांचा आणि पर्यावरणशील उपक्रमांचा विचार पुरस्कार निवड समितीने केलेला असून नवी मुंबई महानगरपालिकेस राज्यात व्दितीय क्रमांकाचा बहुमान जाहीर झालेला आहे. महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी वसुंधरा अभियानातील हा गौरव नवी मुंबईकर नागरिकांच्या सक्रिय सहभागामुळेच प्राप्त झाला असल्याचे सांगत सर्व नागरिकांचे अभिनंदन केले आहे व यापुढील काळात पर्यावरण संवर्धानाच्या दृष्टीने सर्व मिळून अधिक चांगली कामगिरी करूया असे आवाहन केले आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai