Breaking News
मुंबई : राज्या कोरोनाची रुग्णसंख्या नियंत्रणात आली असली तरी धोका टळलेला नाही. मात्र विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करता अनेक परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. दरम्यान इयत्ता दहावीच्या मूल्यमापनाशी संबंधित मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना रेल्वेप्रवासाची परवानगी देण्यात आली आहे. याबाबत शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत मुख्यमंत्री कार्यालयाकडे अर्ज पाठविला होता. सदर प्रस्तावास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मान्यता दिली आहे.
इयत्ता दहावीचा निकाल वेळेत घोषित करण्यासाठी विद्यार्थ्यांचे मूल्यांकन करणे आवश्यक आहे. मूल्यांकन करून विद्यार्थिनिहाय माहिती राज्य मंडळाकडे पाठवणे, श्रेणी तक्ता तयार करणे, इत्यादी कामे करण्यासाठी शिक्षकांना शाळेत उपस्थित राहणे गरजेचे आहे. त्यासाठी शालेय शिक्षण विभागाने शिक्षकांना रेल्वेप्रवासाची परवानगी देण्याबाबतचा प्रस्ताव मुख्यमंत्री कार्यालयाकडे पाठवला होता. शालेय शिक्षण विभागाच्या प्रस्तावाचे गांभीर्य व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दहावी मूल्यमापनाशी संबंधित शिक्षक, शिक्षकेतर कर्मचार्यांना उपनगरीय रेल्वेप्रवासाची मुभा दिली आहे. या निर्णयामुळे दहावी निकाल वेळेत लागण्यास मदत होईल. तसेच पुढील शिक्षणासाठी विविध शाखांमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणार्या विद्यार्थ्यांना यामुळे फायदा होईल.
मुंबईच्या भौगोलिक परीस्थितीचा विचार करता बहुतांश शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी पालघर, वसई, विरार, अंबरनाथ, कल्याण, कर्जत, कसारा व नवी मुंबई आणि पनवेल अशा ठिकाणी राहतात. या मध्ये महिला कर्मचार्यांचे प्रमाण लक्षणीय आहे. या निर्णयामुळे दहावी मूल्यमापनाच्या प्रक्रियेत संबंधित शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांना फार मोठा दिलासा मिळाला आहे. शिक्षकांना उपनगरीय रेल्वेमध्ये लेव्हल 2 किंवा त्यापेक्षा खालील पास देण्यात येतील. हे रेल्वे पास ऑनलाईन एसएमएस डाउनलोडच्या माध्यमातून वितरित करण्यात येतील. यासाठीची लिंक देण्यात येईल. यासर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचार्यांची माहिती जमा करण्यासाठी समन्वय अधिकारी म्हणून विभागीय शिक्षण उपसंचालक, मुंबई हे काम पाहतील.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai