Breaking News
..तर शिवसैनिकही रस्त्यावर उतरतील ; मुख्यमंत्र्यानी दिला इशारा
मुंबई ः नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरणासंदर्भात रविवारी (दि. 20) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत झालेली सर्वपक्षीय कृती समितीची चर्चेची दुसरी फेरीही मुख्यमंत्र्यांच्या फिसकटली. काहीही झाले तरी ‘दिबां’च्या नावासाठी आम्ही माघार घेणार नाही, असा निर्धार सर्वपक्षीय कृती समितीने व्यक्त केला. त्यावर तुम्ही असा आग्रह धरत असाल तर आमचे शिवसैनिकही रस्त्यावर उतरतील, असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला. तसेच मुख्यमंत्र्यांनी शिष्टमंडळाचे म्हणणे ऐकून न घेता ते बैठकीतून एकदा उठून गेले. त्यामुळे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्यासाठी घोषित करण्यात आलेले 24 जून रोजीचे सिडको घेराव आंदोलन कोणत्याही परिस्थितीत होणारच असा निर्धार प्रकल्पग्रस्तांनी केला आहे.
भूमिपुत्र, शेतकरी, प्रकल्पग्रस्त, कष्टकर्यांचे झुंझार नेते दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई विमानतळाला देण्यात यावे, या मागणीसाठी लोकचळवळ उभी राहिली आहे. सर्व स्तरांतून तिला पाठिंबा मिळत आहे. खरंतर ही मागणी सन 2008 पासूनची आहे. असे असताना राज्यातील ठाकरे सरकारने शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे नाव या विमानतळाला देण्यात येईल, असे जाहीर केले असून तसा ठराव राज्याचे नगरविकासमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी सिडकोमार्फत करून घेतला आहे. त्यास रायगड, ठाणे, मुंबई, पालघर जिल्ह्यांतील दिबा प्रेमी नागरिकांचा तीव्र विरोध आहे. हा असंतोष 10 जून रोजी मानवी साखळी आंदोलनातून स्पष्टपणे दिसून आला. तरीही शिवसेनेचे नेते हे बाळासाहेब ठाकरे यांचेच नाव विमानतळाला देण्यात येईल, असे सांगत असून 24 जूनचे आंदोलन दडपण्यासाठी जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत आहेत, मात्र त्यांचा हा डाव यशस्वी होणार नाही, असे लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीने म्हटले आहे. रविवारी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीत सर्वपक्षीय कृती समितीने विमानतळाला दि. बा. पाटील यांच्या नावाचा आग्रह धरला, मात्र चर्चा सुरू होण्यापूर्वीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विमानतळाव्यतिरिक्त दुसरे कुठे नाव सुचवायचे असेल तर सुचवा, असे म्हटले. मात्र कृती समितीने दिबां’च्या नावावर ठाम असल्याचे स्पष्ट केले. तेव्हा मुख्यमंत्र्यांनी तुम्ही असा आग्रह धरत असाल तर आमचे शिवसैनिकही रस्त्यावर उतरतील, असे सांगितले. कृती समितीच्या शिष्टमंडळाचे ऐकून न घेता, चर्चा न करताच मुख्यमंत्री बैठकीतून निघून गेल्याने सर्वपक्षीय कृती समितीने 24 जूनचे आंदोलन कोणत्याही परिस्थितीत करणारच, असा निर्धार केला आहे.
दरम्यान, 24 जूनच्या सिडको घेराव आंदोलनाची जोरदार तयारी सुरू असून, त्या अनुषंगाने घेण्यात येत असलेल्या विभागनिहाय बैठकांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असल्याचे दिसून येत आहे. आमच्या मनानं घेतलाय ठाव, विमानतळाला दिबांचंच नाव!,’ अशी ठाम भूमिका ‘दिबा’ प्रेमी जनतेने घेतली आहे. किमान एक लाख लोकांचा या आंदोलनात सहभाग असणार आहे. शांततापूर्ण स्वरूपात हे आंदोलन केले जाणार असून त्या दृष्टीने नियोजन व तयारी केली जात आहे. बैठकीला राज्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, नवी मुंबईचे पोलीस आयुक्त बिपीनकुमार सिंग, सिडकोचे एमडी संजय मुखर्जी, सर्वपक्षीय कृती समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील, उपाध्यक्ष माजी खासदार रामशेठ ठाकूर, जगन्नाथ पाटील, कार्याध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, आमदार गणपत गायकवाड, तसेच संतोष केणे, गुलाब वझे, जे.डी.तांडेल, दीपक म्हात्रे, भूषण पाटील, दशरथ भगत, मनोहर पाटील, विनोद म्हात्रे, मेघनाथ म्हात्रे आदी उपस्थित होते.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai