Breaking News
दिबांच्या नावासाठी संघर्षाचा लढा कायम राहणार
पनवेल ः रविवारी मुंबईत झालेल्या बैठकीत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा लोकनेते दि. बा. पाटील यांच्या नावाला विरोध असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांनी घेतलेली हि भूमिका प्रकल्पग्रस्त, भूमिपुत्र आणि प्रकल्पग्रस्त गावांवर अन्यायकारी आहे. मुख्यमंत्र्यांच्या या हेकेगिरी भूमिकेला आमचा प्रखर विरोध असून प्रकल्पग्रस्ताचे लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्यासाठी घोषित करण्यात आलेले 24 जून रोजीचे सिडको घेराव आंदोलन कोणत्याही परिस्थितीत होणारच आहे, अशी रोखठोक भूमिका दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीने सोमवारी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत प्रसार माध्यमांसमोर मांडली. आंदोलन दडपण्यासाठी पोलीस प्रशासन अँक्शन मोडवर असेल तर आम्ही रिअँक्शन मोडवर असणार आहोत, असा खणखणीत आवाजही कृती समितीने दिला आहे.
पनवेलमधील महात्मा ज्योतिबा फुले सभागृह (आगरी समाज हॉल) येथे सायंकाळी 04 वाजता पत्रकार परिषद झाली. यावेळी माहिती देताना सांगण्यात आलेली कि, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरणासंदर्भात रविवारी (दि. 20) मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत झालेली लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीची चर्चेची दुसरी फेरीही मुख्यमंत्र्यांच्या हट्टामुळे फिसकटली. मुख्यमंत्री शिष्टमंडळाचे म्हणणे ऐकून न घेता ते बैठकीतून एकदा उठून गेले. त्यामुळे काहीही झाले तरी दिबांच्या नावासाठी आम्ही माघार घेणार नाही, असा निर्धार सर्वपक्षीय कृती समितीने व्यक्त केला. कृती समितीच्या शिष्टमंडळाचे ऐकून न घेता, चर्चा न करताच मुख्यमंत्री बैठकीतून निघून गेल्याने सर्वपक्षीय कृती समितीने 24 जूनचे आंदोलन कोणत्याही परिस्थितीत करणारच, असा निर्धार केला आहे. भूमिपुत्र, शेतकरी, प्रकल्पग्रस्त, कष्टकर्यांचे झुंझार नेते दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई विमानतळाला देण्यात यावे, या मागणीसाठी लोकचळवळ उभी राहिली आहे. सर्व स्तरांतून तिला पाठिंबा मिळत आहे. 10 जून रोजी मानवी साखळी आंदोलनातून प्रकल्पग्रस्तांचा असंतोष स्पष्टपणे दिसून आला. तरीही शिवसेनेचे नेते हे बाळासाहेब ठाकरे यांचेच नाव विमानतळाला देण्यात येईल, अशी भूमिका मुख्यमंत्र्यांनी घेतली आहे. दरम्यान 24 जूनच्या आंदोलनाच्या धसक्यामुळे आंदोलन दडपण्यासाठी पोलिसांनी परवानगी नाकारली आहे त्याचबरोबर नोटिसा बजावण्याचे तर दुसरीकडे दिबासाहेबांच्या नावाला विरोध करणारे विविध क्लुप्त्या करत जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत आहेत, मात्र त्यांचा हा डाव यशस्वी होणार नाही, असे सांगून दिबासाहेबांच्या नावासाठी कितीही विरोध झाला तरी हे आंदोलन होणारच, असेही लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीने यावेळी स्पष्ट केले.
आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर तयारी संदर्भात पत्रकारांच्या प्रश्नांवर उत्तर देताना हे आंदोलन किमान 01 लाख लोकांचा ‘भूतो न भविष्यतो’ असे असणार आहे, पोलीस शासन आंदोलन रोखण्यासाठी अथक प्रयत्न करणार मात्र आमचीही तशी तयारी झाली आहे. दिबांचे नाव विमानतळाला मिळेपर्यंत संघर्ष सुरूच राहणार आहे, असेही यावेळी समितीच्यावतीने सांगण्यात आले. आणि 24 जूनच्या घेराव आंदोलनात पुढील आंदोलनाची भूमिका मांडण्यात येईल, असेही यावेळी कृती समितीच्यावतीने जाहीर करण्यात आले.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai