Breaking News
गेले दोन वर्षापासून न्यायासाठी हेलपाटे
नवी मुंबई : एकीकडे शेतकर्याला हमीभाव मिळत नसल्याने शेतकरी मोठ्या प्रमाणात आत्महत्या करत आहेत. शिवाय देशात सर्वाधिक आत्महत्या महाराष्ट्रात होत आहेत. असाच एक हतबल शेतकरी आज (13 जुलै) नवी मुंबईत हैराण झाला आहे. गेल्या दोन वर्षात 10 वेळा नाशिकहून मुंबईवारी करून सुद्धा या वृद्धाला न्याय मिळत नसल्याचे समोर आले आहे. मुंबई एपीएमसी भाजीपाला मार्केटमधील व्यापार्याने वृद्ध शेतकर्याची फसवणूक केल्याने या वृद्ध शेतकर्याच्या जीवनमरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. सोमनाथ गणपत सानप असं या 65 वर्षीय वृद्ध शेतकर्याचं नाव आहे. हे शेतकरी भाजीपाला व्यापार्याकडे हेलपाटे घालून थकले आहे. शिवाय हा शेतकरी आपल्यापेक्षा वयाने कमी असलेल्या बाजार समिती सभापतींना हाथ जोडून न्याय मिळवून देण्याची विनवणी करत आहे.
नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथील वडगाव पिंगळा येथील सानप बाबांनी मुंबई एपीएमसी भाजीपाला मार्केटमधील इ पाकळीमधील गाळा क्रमांक 836 या गाळ्यावर 2 वर्षांपूर्वी कोबी हा शेतमाल पाठवला होता. या मालाचे 5 लाख 75 हजार रुपये झाले, मात्र ते अद्याप त्यांना मिळालेच नाहीत. या ठिकाणी एस. एस. के. अँड कंपनी नावाने व्यापार करणारा व्यापारी मधुकर सुदाम डावखर याने त्यांची फसवणूक केली असल्याचा आरोप त्यांनी केलाय. मे 2019 मध्ये 2 लाख रुपयाचा धनादेश या व्यापार्याने राजाराम कराड नावे दिला होता. तो सुद्धा वटला न गेल्याने सानप बाबा खुपच चिंताग्रस्त झाले.
याबाबत सानप बाबांनी डिसेंबर 2019 मध्ये बाजार समिती अध्यक्ष आणि सचिवांना अर्ज केला होता. या अर्जावर बाजार समिती प्रशासनाने 29 जून 2021 मध्ये सानप बाबांना सुनावणीसाठी पत्र पाठवले. त्यानुसार 12 जुलै रोजी सानप सुनावणीसाठी पहाटेच एपीएमसीत आले होते. भाजीपाला मार्केट उपसचिव सुनील सिंगटकर यांनी सांगितले की या व्यापार्याने गाळा विकला आहे. आम्ही त्याला ना हरकत प्रमाणपत्र दिले नाही. शिवाय जोपर्यंत या शेतकर्याचे पैसे देणार नाही, तोपर्यंत ना हरकत प्रमाणपत्र दिले जाणार नाही. शिवाय प्रशासनाने दिलेल्या वेळेत शेतकर्याचे पैसे न दिल्यास गाळा निलाव करून शेतकर्याचे पैसे देण्यात येईल.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai