Breaking News
महावितरणची कारवाई ; विज ग्राहकांनी थकवले 480 कोटी
मुंबई : महावितरणमधील अनेक ग्राहकांनी आपले कोरोना काळातील वीजबिल थकविले आहेत. ही थकबाकी 480 कोटींवर गेली आहे. परिणामी महावितरणाला आर्थिक झळ सोसावी लागत आहे. त्यामुळे मुख्य कार्यालयाने वीजबिल वसुलीसाठी सर्व परिमंडलांना निर्देश दिले आहेत. सक्तीची कारवाई म्हणून महावितरणने भांडूप परिमंडलातील एक लाख 116 ग्राहकांचा वीजपुरवठा थकबाकीपोटी खंडित केला आहे.
भांडूप परिमंडलातील उच्चदाब ग्राहकांची थकबाकी 40.61 कोटी आहे. लघुदाब ग्राहकांतील घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक ग्राहकांची थकबाकी 235.7 कोटी, सार्वजनिक पाणीपुरवठा योजनांची थकबाकी 5.76 कोटी इतर ग्राहकांची 8.85 कोटी, स्ट्रीटलाईटची थकबाकी 185.08 कोटी आहे. उच्चदाब व लघुदाब ग्राहकांची थकबाकी 480.64 कोटी एवढी आहे. भांडूप परिमंडलाने विविध माध्यमातून ग्राहकांना वीजबिल भरण्याचे आवाहन वारंवार केले आहे. महावितरणची आर्थिक स्थिती गंभीर असून मुख्य कार्यालयाने वीजबिलाची थकबाकी वसूल करण्याचे निर्देश सर्व परिमंडलाना दिले. नाईलाजाने महावितरणला थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याची वेळ आली आहे.
महावितरणच्या भांडूप परिमंडलातील थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याची जोरदार मोहीम सुरु असून आत्तापर्यंत एक लाख 116 ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित केला आहे. भांडूप परिमंडलातील ठाणे मंडळात 18.11 कोटी थकबाकी असलेल्या 28225 ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित केला आहे. पेण मंडळात 133.74 कोटी थकबाकीमुळे 39890 ग्राहकांचा तर वाशी मंडळात 49.11 कोटी थकबाकीमुळे 32001 ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित केला आहे.
आपण टीव्ही, मोबाईल रिचार्ज, व इतर सुविधेचा वापर करण्यासाठी पैसे भरतो, त्याचप्रमाणे वापरलेल्या विजेचे पैसे भरलेच पाहिजे. तसेच, ग्राहक वीजचोरी करून किंवा अनधिकृतपणे वीजवापर करतांना आढळल्यास त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल. - सुरेश गणेशकर, मुख्य अभियंता भांडूप परिमंडल
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai