Breaking News
पनवेल ः एका 15 वर्षीय युवकाच्या हत्येप्रकरणी तीन जणांना कळंबोली पोलिसांनी ताब्यात घेतल्याने या खूनाची उकल झाली आहे. कळंबोली पोलीस ठाणे हद्दीत 23 ऑगस्ट 2021 रोजी एक 15 वर्षीय युवक जखमी अवस्थेत निपचित पडलेला आढळून आलेला होता. त्यास उपचारासाठी उपजिल्हा रूग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. याप्रकरणी कळंबोली पोलीस ठाणे येथे गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती. याप्रकरणी तीन जणांना ताब्यात घेतले आहे.
कळंबोली पोलीसांनी सर्वप्रथम मृताची ओळख पटवली. त्याचे नाव नितेश सुनिल दुबेदी, वय- 15 वर्षे, रा . कोपरागाव, खारघर असे असल्याचे निष्पन्न झाले. मयत व त्याचे कुटूंबिय हे पुर्वी कंळबोली येथेच राहत होते. मयत यास गांजा, दारू, भांग गोळीचे व्यसन होते. तो कळंबोली परीसरात रात्री अपरात्री फिरून त्याचे मित्रांसह लहान मोठया चोर्या करून त्यातून मिळणारे पैशातून नशा करीत असल्याची माहीती समोर आली. त्या दृष्टीने करण्यात आलेले तपासामध्ये रात्री उशीरा मयत नितेश दुबेदी हा त्याच्या मित्रांसोबत घटनास्थळापासूनच काही अंतरावर मिनी मार्केटचे आडोशाला दारू पित बसलेला होता. त्या ठिकाणी अजून एक अल्पवयिन मित्रसुध्दा दारू पिण्यास आला होता. त्यावेळी मयत नितेश दुबेदी याने त्यास त्या ठिकाणी दारू पिण्यास का आला असे बोलून हाताने मारहाण केली होती. त्यावरून त्यात आपसात वादावादी झाली. वादावादी चालु असताना त्या तिघांनी मिळुन मयत नितेश दुबेदी यास डोश्या बुक्यांनी व काठीने बेदम मारहाण करून ते निघून गेले. यात त्याचा मृत्यु झाला होता. गुन्ह्यामध्ये कोणताही धागादोरा नसताना मयत याची पार्श्वभूमी व इतर सर्वकश बाबींचा बारकाईने व कौशल्याने तपास करून मयतासोबत दारू पिणारे व नंतर गुन्हा करणारे आरोपी निष्पन्न करून कळंबोली पोलीस ठाणेकडील अधिकारी अमलदार यांनी सदरचा गंभीर असा गुन्हा उघडकीस आणलेला आहे. सदर गुन्ह्यातील तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. या तपासकामी कळंबोली पोलीस ठाणेचे वपोनि संजय पाटील, सपोनि नितीन कुंभार, पोउपनिरी मनेश बच्छाव व गुन्हे प्रकटिकरण पथकाचे सर्व अंमलदार यांनी गुन्हा घडल्यापासुन अहोरात्र मेहनत घेवून सदरचा गुन्हा उघडकीस आणण्यात महत्वपूर्ण भुमिका बजावलेली आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai