Breaking News
मुंबई ः देशात सतत वाढणार्या इंटरनेट वापरकर्त्यांमुळे काही वर्षांमध्ये ऑनलाईन शॉपिंगमध्ये अनेक पटींनी वाढ होईल, असा अंदाज वर्तवला जात आहे. एमएमए इंडिया आणि मीडिया एजन्सी ग्रुपएमने जाहीर केलेल्या अहवालानुसार, 2025 पर्यंत भारतातल्या इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या 90 दशलक्षांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. इंटरनेट वापरकर्त्यांच्या वाढत्या संख्येमुळे, देशातल्या ऑनलाइन खरेदीदारांची संख्या 2030 पर्यंत 500 दशलक्षांपर्यंत वाढेल. परवडणार्या इंटरनेटमुळे ग्राहक अधिक प्रमाणात डिजिटल माध्यमाद्वारे खरेदीचा अवलंब करत असल्याचं अहवालात म्हटलं आहे. ऑनलाईन किरकोळ बाजारात चार ते पाच वर्षांमध्ये तिपटीने वाढ अपेक्षित आहे. 50-60 अब्ज डॉलरच्या ऑनलाईन किरकोळ बाजारपेठेत उत्पादनांचा हिस्सा 60 टक्के आहे तर उर्वरित वाटा सेवांचा आहे.
या व्यतिरिक्त ऑनलाईन बाजारपेठेमध्ये प्रवास, वाहतूक आणि पर्यटन, ग्राहक उपकरणं आणि इलेक्ट्रॉनिक्स व्यवसाय 50-60 टक्के योगदान देतात. या श्रेणींमध्ये ई-कॉमर्स कंपन्यांची उलाढाल सर्वाधिक आहे. किराणा, शिक्षण, आरोग्य यासारख्या श्रेणी एकूण ऑनलाईन किरकोळ व्यवसायात फक्त 9 ते13 अब्ज आहेत. या अहवालाचा हवाला देत, ग्रुपएम साऊथ एशियाच्या ग्रोथ अँड ट्रान्सफॉर्मेशनचे अध्यक्ष तुषार व्यास म्हणाले की ऑनलाईन रिटेलिंग इलेक्ट्रॉनिक्सपासून किराणाकडे वळत आहे. गेल्या बारा महिन्यांमध्ये 73 टक्के ग्राहकांनी ऑनलाईन उत्पादनं खरेदी केली आहेत. याचं मुख्य कारण म्हणजे उत्पादनांची गुणवत्ता, माहिती, परतावा आणि हमी. खरेदी करताना ग्राहकांनी उत्पादनांच्या गुणवत्तेवर सर्वाधिक 63 टक्के भर दिला. 62 टक्के शहरी ग्राहक ऑनलाईन किंवा ऑफलाईन खरेदी करण्यापूर्वी उत्पादनांची माहिती ऑनलाईन गोळा करताना दिसतात.
कोरोनाच्या काळात इलेक्ट्रॉनिक्स उपकरणं आणि वेगवेगळ्या ब्रँड्सचे कपडे, लॅपटॉप, कॉम्प्युटर आणि स्मार्ट फोन आदी वस्तूंच्या खरेदीसाठी ग्राहक पुन्हा एकदा ऑनलाईन शॉपिंगकडे वळत असल्याचं चित्र आहे. लॉकडाउन शिथिल करण्यात आल्याने ऑनलाईन पोर्टलद्वारे केल्या जाणार्या घरपोच डिलिव्हरीला परवानगी मिळाली आहे; शिवाय ऑनलाइन शॉपिंगच्या अनेक वेबसाइट आणि ऍप्सने सेल सुरू केल्याने ग्राहकांनी ऑनलाईन वस्तूखरेदीला चांगला प्रतिसाद दिला आहे. मोबाइल, कपडे आणि इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंना सध्या सर्वाधिक मागणी असून किराणा माल आणि खाद्यपदार्थांनाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. कमी वेळेत डिलिव्हरी आणि बाजारभावापेक्षा कमी दरात वस्तू मिळत असल्याने लॉकडाउननंतरही ग्राहक ऑनलाईन शॉपिंगकडे वळत असून, त्यामुळे अर्थचक्राला पुन्हा एकदा गती यायला सुरुवात झाली आहे.
ग्राहकांनी खरेदी केलेल्या वस्तूंमध्ये दोष आढळल्यास त्या बदलून दिल्या जात असल्याने; तसंच रिफंड करण्याचाही पर्याय उपलब्ध असल्याने ग्राहकांचा ऑनलाईन शॉपिंगवर विश्वास अधिक वाढला आहे. लॉकडाउनच्या काळात अनावश्यक वस्तूंची खरेदी करणं बंद झाल्याने ऑनलाइन खरेदीची सेवा पुरवणार्या कंपन्यांनाही फटका बसला होता; परंतु सध्याचा ग्राहकांकडून मिळत असलेला प्रतिसाद आणि आकर्षक ऑफर्समुळे सर्व कंपन्या पुन्हा एकदा भरारी घेत असून कोरोनानंतर अर्थव्यवस्था बळकट करण्यात या कंपन्यांचाही मोठा वाटा राहणार आहे. वस्तूंच्या ऑनलाईन विक्रीसह अनेक कंपन्यांनी अत्यावश्यक असलेल्या किराणा, भाजीपाला आणि दुधाचीही डिलिव्हरी सुरू केल्याने लॉकडाउनमध्ये या कंपन्यांनी आपला व्यवसाय ठप्प होऊ दिलेला नाही. ग्राहकांना आता हवी ती वस्तू घरपोच मिळत असल्याने ऑनलाईन शॉपिंगकडे कल वाढला आहे. यातून डिलिव्हरी करणार्या कर्मचार्यांनाही चांगल्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होत आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai