Breaking News
नवी मुंबई ः 10 सप्टेंबरपासून सुरू झालेला यावर्षीचा श्रीगणेशोत्सव कोव्हीड 19 च्या पार्श्वभूमीवर आंतरिक भक्तीभावाने शासकीय मार्गदर्शक सूचनांचे पालन करीत अत्यंत उत्साहात संपन्न झाला. 22 पारंपारिक विसर्जनस्थळांवर तसेच 151 कृत्रिम विसर्जन स्थळांवर स्वतंत्र निर्माल्य कलशांची व्यवस्था करण्यात आली होती. येथे 50 टन 330 किलो जमा झालले ओले निर्माल्य तुर्भे प्रकल्पस्थळी नेण्यात येऊन त्यावर शास्त्रोक्त खत निर्मिती प्रक्रिया केली जात आहे.
नवी मुंबईकर नागरिकांचा पर्यावरणशील दृष्टीकोन लक्षात घेऊन महानगरपालिकेच्या वतीनेही प्रतिवर्षीप्रमाणेच श्रीमुर्तींसोबत विसर्जनस्थळी येणा-या पुष्पमाळा, फुले, दुर्वा, तुळस, शमी, फळांच्या साली-तुकडे यासारखे पुनर्प्रक्रिया करण्यायोगे ‘ओले निर्माल्य’ तसेच मुर्तीच्या गळ्यातील कंठी, सजावटीचे सामान असे ‘सुके निर्माल्य’ ठेवण्यासाठी 22 पारंपारिक विसर्जनस्थळांवर तसेच 151 कृत्रिम विसर्जन स्थळांवर स्वतंत्र निर्माल्य कलशांची व्यवस्था करण्यात आली आहे. ओले व सुके निर्माल्य वेगवेगळ्या कलशात ठेवण्याच्या संकल्पनेला नागरिकांनी नेहमीप्रमाणेच उत्तम प्रतिसाद दिल्यामुळे यावर्षीच्या श्रीगणेशोत्सव विसर्जन कालावधीत दीड दिवसाच्या विसर्जनादिवशी 12 टन 95 किलो, गौरीसह पाच दिवसाच्या विसर्जनाप्रसंगी 24 टन 140 किलो तसेच सात दिवसाच्या विसर्जनाप्रसंगी 3 टन 680 किलो आणि अनंत चतुर्दशीदिनी मोठ्या संख्येने होणार्या विसर्जनप्रसंगी 10 टन 415 किलो अशाप्रकारे गणेशोत्सवातील 4 विसर्जनदिनी एकूण 50 टन 330 किलो इतके ओले निर्माल्य जमा झाले आहे. या निर्माल्याच्या वाहतुकीसाठी स्वतंत्र वाहन व्यवस्था करण्यात आली होती. हे निर्माल्य महानगरपालिकेच्या अद्ययावत तुर्भे प्रकल्पस्थळी स्वतंत्रपणे ठेवण्यात आले असून त्यावर शास्त्रोक्त खत निर्मिती प्रक्रिया केली जात आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai