Breaking News
21 ते 28 सप्टेंबर या कालावधीत देणार जंतनाशक गोळी
नवी मुंबई ः राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात दि. 21 ते 28 सप्टेंबर 2021 या कालावधीत ‘राष्ट्रीय जंतनाशक मोहीम’ राबविण्यात येत आहे. यामध्ये 1 ते 19 वर्षे वयोगटातील मुला-मुलींना वयोगटानुसार निश्चित केल्याप्रमाणे जंतनाशक गोळी देण्यात येणार आहे. ज्या शाळा सुरु आहेत त्या शाळांमध्ये हजर असणार्या मुलामुलींना शिक्षकांद्वारे तसेच अंगणवाडीमध्ये जाणार्या मुला-मुलींना अंगणवाडी शिक्षकांद्वारे गोळी देण्यात येईल. शाळेत न जाणार्या मुला-मुलींना आरोग्य कर्मचारी व स्वयंसेवक यांच्याकडून गृहभेटीद्वारे गोळी देण्यात येईल.
1 ते 19 वयोगटातील किमान 28 टक्के बालकांमध्ये आढळणारा आतड्यांचा कृमीदोष मातीतून प्रसारित होणार्या जंतांपासून होतो. परिसर स्वच्छतेचा अभाव असणे हे याचे एक प्रमुख कारण आहे. कृमीदोष हा रक्तक्षय आणि कुपोषणाचे कारण असून त्यामुळे बालकांची शारीरिक व बौद्धिक वाढ खुंटते. ही महत्वाची बाब लक्षात घेऊन या आजारांचा प्रतिबंध करण्याच्या उद्देशातून राष्ट्रीय जंतनाशक मोहीम राबविली जात आहे. जंताचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जंतनाशक गोळी घेण्याबरोबरच हात स्वच्छ धुणे, शौचालयाचा वापर करणे, भाज्या व फळे स्वच्छ धुवून खाणे, नखे नियामित कापणे व स्वच्छ ठेवणे, बाहेर जाताना बूट अथवा चपलांचा वापर करणे अशी खबरदारी घेणे आवश्यक आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या सर्व 23 नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांमार्फत ही मोहींम राबविण्यात येत असून 1 ते 2 वयोगटातील मुला-मुलींसाठी 200 मिलिग्रॅमची गोळी चुरा पावडर करूनच पाण्याबरोबर देण्यात येईल. 2 ते 19 वयोगटातील मुला-मुलीना 400 मिलिग्रॅमची गोळी चुरा अथवा तुकडे पाण्याबरोबर देण्यात येणार आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai