Breaking News
7 ते 8 हजार रोजगाराची संधी ; आ. मंदा म्हात्रे प्रयत्नांतून जेट्टींचे नुतनीकरण
नवी मुंबई ः खाडीकिनार्यावर वसलेल्या नवी मुंबईच्या या सागरी किनार्यांचा विकास करण्याबरोबरच येथील भुमिपुत्र मच्छीमारांच्या समस्या प्राधान्याने सोडविण्यासाठी आमदार मंदाताई म्हात्रे प्रयत्नशील आहेत. म्हात्रे यांच्या पुढाकाराने, सततच्या पाठपुराव्यामुळे नवी मुंबईत जेट्टी व्हिजन राबविले जात असून दिवाळे, सारसोळी, घणसोली, दिवा, ऐरोली येथील जेट्टींची कामे लवकरच मार्गी लागणार आहेत. यात तीन प्रवासी जेट्टींचा समावेश असून त्यांचेही दिवाळीपर्यंत उद्धाटन होणे अपेक्षित असून त्यादृष्टीने कार्यवाही करण्यात येणार असल्याचे आ. म्हात्रे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. तसेच या जेट्टी व्हिजनमुळे येथील 7 ते 8 हजार स्थानिकांना रोजगाराची संधीही उपलब्ध होणार आहे. यामुळे नवी मुंबईकरांसह येथील भुमिपुत्र असलेल्या आगरी-कोळी समाजाला, मच्छीमारांना मोठा दिलासा मिळाला आहे.
नवी मुंबईला खाडीकिनारा लाभला असल्याने येथील आगरी-कोळी बांधवाचा पारंपरिक व्यवसाय हा शेती व मच्छीमारी आहे. शहराचा विकास होत असताना येथील शेतजमिन सिडकोला दिल्यानंतर केवळ मासेमारी हा एकच व्यवसाय शिल्लक राहिला. अजूनही येथे असंख्य स्थानिक मच्छीमारी करुन आपला उदरनिर्वाह करत आहेत. मात्र मच्छीमारी करताना त्यांना अनेक समस्या भेडसावत आहेत. सर्व सोयीसुविधांयुक्त जेट्टी उपलब्ध नसल्याने त्यांची गैरसोय होत आहे. त्यांची ही अडचण दूर करण्यासाठी आ. मंदाताई म्हात्रे गेल्या 10 वर्षापासून प्रयत्न करत आहेत. आ. मंदा म्हात्रे यांनी पाठपुरावा करुन त्यासाठी लागणार्या परवानग्या मिळवल्या आहेत. त्यांनी महाराष्ट्र मेरी टाईम बोर्डकडे वेळोवेळी केलेल्या पाठपुराव्यामुळे जेट्टींच्या पुनर्बांधणीची कामे हाती घेण्यात आली आहेत. त्यामुळे दिवाळे, घणसोली, सारसोळे, ऐरोली, वाशी, दिवा येथील जेट्टींची कामे लवकरच मार्गी लागणार आहेत. यामुळे मच्छीमार बांधवांना दिलासा मिळणार आहेच शिवाय नवी मुंबईला लाभलेल्या खाडीकिनार्यांचे सुशोभिकरण करुन तेथे पर्यटन स्थळ विकसीत करण्याचाही म्हात्रे यांचा उद्देश सफल होणार आहे. यामध्ये दिवाळे, ऐरोली आणि घणसोली येथे प्रवासी जेट्टी बांधण्यात येणार आहे. वाशी सगारविहार येथे हॉवर क्राफ्टची सेवा देण्यात येणार आहे. प्रवासी जेट्टींच्या येथे फ्लेमिंगो पार्क विकसीत करण्यात येणार आहे. ज्यामुळे नवी मुंबईकरांना खाडीसफर, फ्लेमिंगो दर्शन, नवी मुंबई ते मुंबई जलप्रवास शक्य होणार आहे. जिथे जेट्टी तिथे मार्केट उपलब्ध करुन देण्याचा मानसही त्यांनी यावेळी व्यक्त केला. आ. मंदा म्हात्रे यांच्या जेट्टी व्हिजनमुळे स्थानिकांचा मच्छीमारी हा व्यवसाय तर टिकून राहिलच शिवाय 7 ते 8 हजार रोजगाराच्या संधीही उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे येथील आगरी-कोळी मच्छीमारांना मोठा दिलासा मिळाला आहे..
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai