Breaking News
नवी मुंबई महानगरपालिका व एमआयडीसीमध्ये सामंजस्य करार
नवी मुंबई ः केंद्र शासनाच्या अमृत मिशन प्रकल्पांतर्गत कोपरखैरणे व ऐरोली येथील मलप्रक्रिया केंद्रांत प्रत्येकी 20 द.ल.लि. क्षमतेचे टर्शिअरी ट्रिटमेंट प्रकल्प उभारुन त्यामधील पुर्नप्रक्रियाकृत पाणी टीटीसी औद्योगिक क्षेत्रातील उद्योगसमुहांना पुरविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार 2017 पासून हे काम सुरु असून या वर्षाअखेरीस डिसेंबर 2021 पर्यंत हे प्रकल्प कार्यन्वित होऊन एमआयडीसी क्षेत्रातील वाशी, कोपरखैरणे, ऐरोली भागातील उद्योग समुहांना पुर्नप्रक्रियाकृत स्वच्छ पाणी पुरविले जाणार आहे. याविषयीचा नवी मुंबई महानगरपालिका आणि एमआयडीसी यांच्यामधील सामंजस्य करार नुकताच करण्यात आला आहे. या करारानुसार सदर पुनर्प्रक्रियाकृत पाणी टीटीसी क्षेत्रातील औद्योगिक संस्थाना रु.18.50 प्र.घ.मि. दराने पुरविण्याचे निश्चित करण्यात आले असून त्यामुळे नवी मुंबई महानगरपालिकेस 15 वर्षांमध्ये 494 कोटी इतका महसुल प्राप्त होणार आहे.
शहराच्या वाढत्या लोकसंख्येचा दूरगामी विचार करून महाराष्ट्र शासनाकडून सन 2002 मध्ये मोरबे धरण प्रकल्प हस्तांतरीत करून पूर्ण करण्यात आला. त्यासोबतच पाणी बचतीचे उद्दीष्ट नजरेसमोर ठेवून शहरात दररोज निर्माण होणार्या 450 द.ल.लि. सांडपाण्यावर 100 टक्के शास्त्रोक्त प्रक्रीया करून त्या पाण्याचा पुर्नवापर करणार्या सी-टेक अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारीत 7 मलप्रक्रिया केंद्रांची उभारणी करण्यात आली. त्यामध्येही आधुनिकता जपत केंद्र शासनाच्या अमृत मिशन प्रकल्पांतर्गत कोपरखैरणे व ऐरोली येथील मलप्रक्रिया केंद्रांत प्रत्येकी 20 द.ल.लि. क्षमतेचे टर्शिअरी ट्रिटमेंट प्रकल्प उभारुन त्यामधील पुर्नप्रक्रियाकृत पाणी टीटीसी औद्योगिक क्षेत्रातील उद्योगसमुहांना पुरविण्याचे नियोजन करण्यात आले. त्यानुसार 2017 मध्ये हे काम सुरु करण्यात आले असून या वर्षाअखेरीस डिसेंबर 2021 पर्यंत हे प्रकल्प कार्यन्वित होऊन एमआयडीसी क्षेत्रातील वाशी, कोपरखैरणे, ऐरोली भागातील उद्योग समुहांना पुर्नप्रक्रियाकृत स्वच्छ पाणी पुरविले जाणार आहे.
या टर्शिअरी ट्रिटमेंट प्रकल्पांमध्ये अल्ट्रा फिल्टरेशन व अल्ट्रा व्हायलेट अशा प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला असून येथील मलप्रक्रिया केंद्रात स्वच्छ होणार्या प्रक्रियाकृत पाण्यावर टर्शिअरी ट्रिटमेंटव्दारे प्रक्रिया केली जाऊन हे पुनर्प्रक्रियाकृत पाणी अधिक स्वच्छ होणार आहे. या पुनर्प्रक्रियाकृत पाण्याची गुणवत्ता केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या गुणवत्ता निकषापेक्षा उत्तम दर्जाची असल्याने तसेच एमआयडीसी कडून टीटीसी औद्योगिक क्षेत्रात पुरवठा करण्यात येणा-या पाण्याइतकी चांगली असल्याने या पुनर्प्रक्रियाकृत पाण्याचा वापर टीटीसी औद्योगिक क्षेत्रातील उद्योग समुहांना पुरवठा कऱण्याचे गृहित धरून हा पथदर्शी प्रकल्प महाराष्ट्र शासनाने केंद्र शासनाच्या अमृत योजनेअंतर्गत मंजूर केला आहे. केंद्र सरकार, महाराष्ट्र शासन आणि नवी मुंबई महानगरपालिका यांच्यामार्फत हा प्रकल्प एकत्रितपणे राबविण्यात येत आहे. याविषयी नवी मुंबई महानगरपालिका आणि एमआयडीसी यांच्यामधील सामंजस्य करार महापालिका आयुक्त अभिजीत बांगर आणि एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पी. अनबलगन यांच्या मान्यतेने नुकताच करण्यात आला आहे. या करारानुसार सदर पुनर्प्रक्रियाकृत पाणी टीटीसी क्षेत्रातील औद्योगिक संस्थाना रु.18.50 प्र.घ.मि. दराने पुरविण्याचे निश्चित करण्यात आले असून त्यामुळे नवी मुंबई महानगरपालिकेस 15 वर्षांमध्ये 494 कोटी इतका महसुल प्राप्त होणार आहे.
सद्यस्थितीत एमआयडीसी मार्फत टीटीसी औद्योगिक क्षेत्रात रु.22.50 प्र.घ.मि. याप्रमाणे 50 द.ल.लि. इतका पाण्याचा पुरवठा केला जात असून त्याजागी टर्शिअरी ट्रिटमेंट प्रकल्पातील पुनर्प्रक्रियाकृत पाणी रु.18.50 प्र.घ.मी. या दराने उपलब्ध होणार असल्याने उद्योग समुहांच्या खर्चातही मोठी बचत होणार आहे. तसेच हे प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर सद्यस्थितीत एमआयडीसी मार्फत उद्योग समुहांना पुरविण्यात येणार्या पाण्याची बचत होणार असून हे बचत झालेले पिण्याचे पाणी एमआयडीसी मार्फत एमएमआरडीए क्षेत्रातील नागरिकांना उपलब्ध होणार असल्याने पाण्याची अडचण दूर होणार आहे. त्याचप्रमाणे केंद्र सरकार व राज्य शासन यांनी जाहीर केलेल्या नागरी भागातील सांडपाणी पुनर्वापर धोरणाची अंमलबजावणी होणार आहे तसेच यामुळे सागरी प्रदूषणही कमी होणार आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai