Breaking News
महाआवास अभियान-टप्पा 2 चा शुभारंभ
मुंबई : गोरगरीबांच्या घरांचे स्वप्न पूर्ण करण्याचे काम सरकारचे असून राज्यातील जनतेकरिता शासकीय अधिकार्यांनी कमीत कमी वेळेत घरे बांधून ते स्वप्न पूर्ण करावे. या महाआवास अभियानामुळे ग्रामीण भागातील लाभार्थींना स्वत:च्या मालकीचे पक्के घर मिळणार आहे. महाआवास अभियानाच्या पहिल्या टप्प्यात मिळालेले यश पाहता महाआवास अभियान टप्पा-2 मध्ये 5 लाख घरे बांधण्याचे उद्दिष्ट असून ते पूर्ण करण्याचा संकल्प करून महाराष्ट्र राज्य अन्य राज्याच्या तुलनेत अधिक सक्षमपणे आणि गतिमानतेने पुढे नेऊ, असा निर्धार ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला.
महाआवास अभियान- ग्रामीण टप्पा-2 चा शुभारंभ मंगळवारी ग्रामविकास मंत्री मुश्रीफ यांच्या हस्ते मंत्रालयात करण्यात आला. यावेळी ते म्हणाले, राज्यातील ग्रामीण भागात ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून विविध ग्रामीण आवास योजनांमधून शासन बेघरांना सर्व सुविधांनी युक्त असा हक्काचा निवारा पुरविण्यात यशस्वी होत आहे. याचाच भाग म्हणून 20 नोव्हेंबर 2020 ते 5 जून 2021 या कालावधीत राबविलेल्या महा आवास अभियान-ग्रामीण (टप्पा-1) मध्ये 1260 पेक्षा जास्त बहुमजली इमारती, 630 पेक्षा जास्त गृहसंकुले तसेच 750 घरकुल मार्ट सुरू करण्यात आले आहे. याचबरोबर 50 हजार 112 भूमीहिन लाभार्थ्यांना घर बांधण्यासाठी जमीन उपलब्ध करून देण्यात आली आहे. टप्पा-1 मध्ये 4 लाख 25 हजार घरकुले भौतिकदृष्ट्या बांधून पूर्ण केली असून उर्वरित घरकुले तत्काळ पूर्ण करण्यात येणार आहे. महाआवास अभियान टप्पा-2 हा 20 नोव्हेंबर 2021 ते 31 मार्च 2022 या कालावधीत असून हे अभियान अधिक गतिमानतेने आणि गुणवत्तेने राबविण्यात येणार असल्याचे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.
राज्यमंत्री सत्तार म्हणाले, बेघर व्यक्तींना घरे देण्यात काही अडचणी येत असेल, त्यांच्या घरांकरिता रेती, वाळू, आदी साहित्य मिळण्यास अडचणी निर्माण होत असतील, तर त्या शासन स्तरावर तत्काळ सोडविण्यासाठी प्रयत्न केले जातील. या घरांकरिता काही रक्कम केंद्र सरकारकडून मिळत असून ती रक्कम मिळण्यास अडचणी असल्यास त्याही प्राधान्याने सोडविल्या जातील. या महा आवास अभियानात उत्कृष्ट काम करणार्या व्यक्ती आणि संस्थांना राज्यस्तरीय, विभागीय, जिल्हास्तरीय, तालुकास्तरीय तसेच ग्रामपंचायतस्तरीय पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार असल्याची कल्पना अतिशय उत्तम असल्याचे सत्तार यांनी यावेळी सांगितले. याप्रसंगी मंत्री मुश्रीफ यांच्या हस्ते महाआवास अभियान-ग्रामीण 2021-22 च्या घडीपुस्तिका तसेच पोस्टरचे विमोचन करण्यात आले. यावेळी राज्य व्यवस्थापन कक्ष-ग्रामीण गृहनिर्माणच्या महाआवास हेल्पलाईन 1800 22 2019 हा टोल फ्री क्रमांकही सगळ्यासाठी खुला करण्यात आला.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai