Breaking News
नवी मुंबई ः महानगरपालिकेच्या वतीने साकारण्यात आलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकातील अंतर्गत सजावटींचे ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते व्हर्च्युअल प्रणालीमार्फत लोकार्पण करण्यात आले आहे. या प्रेरणादायी स्मारकातून प्रत्येकाला बाबासाहेबांच्या विचारांची ऊर्जा लाभेल असा विश्वास यावेळी शिंदे यांनी व्यक्त केला.
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सेक्टर 15, ऐरोली येथे उभारण्यात आलेल्या भव्यतम स्मारकातील वातानुकूलीत अद्ययावत सभागृह, ध्यान केंद्र, ‘ई लायब्ररी’ सुविधेसह समृध्द ग्रंथालय, अत्याधुनिक ऑडिओ सुविधेसह जीवन प्रवास दर्शविणारे माहितीपूर्ण छायाचित्र दालन, आभासी चलचित्र विशेष कक्ष अशा विविध सुविधांच्या लोकार्पण समारंभप्रसंगी पालकमंत्री एकनाथ शिंदे आपले मनोगत व्यक्त करीत होते. याप्रसंगी व्यासपीठावर ठाणे लोकसभा सदस्य खा.राजन विचारे, महापालिका आयुक्त अभिजीत बांगर, महाराष्ट्र शासनाच्या झोपडपट्टी सुधार मंडळाचे अध्यक्ष विजय नाहटा, शासनाच्या वडार समाज समन्वय समितीचे अध्यक्ष विजय चौगुले आणि इतर मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना ठाणे लोकसभा सदस्य खासदार राजन विचारे यांनी हे देशातील सर्वोत्तम स्मारक आहे असे मत व्यक्त केले. यापुढील काळात नवी मुंबईत नवनवे लोकोपयोगी प्रकल्प राबविण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली. महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी प्रास्ताविकपर मनोगतात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या आधी स्मारकातील विविध सुविधा जनतेसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या ही खर्या अर्थाने बाबासाहेबांप्रती व्यक्त केलेली आदरांजली आहे सांगितले.
याप्रसंगी पालकमंत्री यांच्या हस्ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे सुप्रसिध्द सुलेखनकार अच्युत पालव यांनी चितारलेल्या बोधचिन्हाचे अनावरण करण्यात आले. नवी मुंबई शहरातीलच नव्हे देशातील एक उत्कृष्ट स्मारक म्हणून नावाजले जाईल अशा प्रकारे स्मारकातील सुविधा असल्याचे मत पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सर्व मान्यवर आणि नागरिकांनी व्यक्त केलेले असून यामुळे नवी मुंबईच्या नावलौकीकात लक्षणीय भर पडलेली आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai