Breaking News
नवी मुंबई : शहरातील रिक्षाचालकांकडून वाहतूक नियम पायदळी तुडविले जात आहेत. अवैध ठिकाणी रिक्षा थांबविणे, परवाना क्रमांक न टाकणे, क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी वाहतूक करणे, सिग्नल तोडणे असे प्रकार बेशिस्त रिक्षाचालकांकडून सर्रास होत आहेत.
शहरामध्ये 37000 रिक्षा धावत आहेत. गेल्या तीन ते चार वर्षामध्ये खाजगी व सार्वजनिक वाहनांपेक्षा रिक्षांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे रेल्वे स्टेशन, मुख्य रस्त्यांसह अंतर्गत रस्त्यांवरही रिक्षांचे अवैध थांबे वाढले आहेत. रिक्षा स्टॅँड वर लांबच लांब रांगा लागत असून ठिकठिकाणी वाहतूक कोंडी होत आहे. बस थांबे, रहदारी असलेले चौक या ठिकाणी रस्त्याच्या मध्येच बेशिस्त रिक्षाचालकांकडून वाहन थांबवून प्रवासी घेतले किंवा उतरवले जात आहेत. त्यामुळे इतर वाहनचालकांना याचा त्रास होत असून बाचाबाची, शिवीगाळ तर काही वेळा हातघाईवर प्रसंग येत असल्याचे दिसून येत आहे.
शेअर रिक्षांमधून क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी बसविले जातात. अनेक वेळा सिग्नल तोडले जात आहेत त्यामुळे अपघाताची शक्यता वाढत आहे. काही संघटनांच्या दबावामुळे अशा रिक्षा चालकांवर वाहतूक पोलिस कारवाई करणे टाळत असल्याचा आरोप काही प्रवासी नागरिकांकडून केला जात आहे.
नियम मोडणार्या आणि गैरवर्तन करणार्या रिक्षाचालकांविरोधात कडक कारवाई सुरू आहे. रिक्षाचालकांविषयी काही तक्रारी असल्यास प्रवाशांनी वाहतूक पोलिसांकडे तसेच आरटीओ कार्यालयाच्या संकेतस्थळावर तक्रार नोंद करावी. - हेमांगिनी पाटील, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, नवी मुंबई
रिक्षा चालकांकडून मास्क न लावणे, कुठेही रिक्षा थांबविणे, जाब विचारल्यास अरेरावी करणे, उद्धटपणे बोलणे असे प्रकार सुरूच आहेत. वाहतूक पोलिसांनी रिक्षा चालकांना प्रवाशांबरोबर कसे बोलावे व वाहतूक नियम काय आहेत याबाबत विशेष शिबीर आयोजित करून त्यांच्यासाठी ते अनिवार्य करण्याची गरज आहे. - संदीप देशमुख, कोपरखैरणे
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai