Breaking News
कॅबिनेट मंत्र्यांनी केलेल्या आरोपांची सखोल चौकशी करण्याची मागणी
नवी मुंबई : नवी मुंबई महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रभाग रचनेचे कच्चे प्रारुप आराखडे राज्य निवडणूक आयोगाकडे महापालिकेने सादर केले आहेत. परंतु प्रभागरचना नियमबाह्य पद्धतीने केली असून सत्ताधार्यांनी पालिका अधिकार्यांना हाताशी धरुन स्वतःला हवी तशी केली असल्याचा आरोप करुन याबाबतची तक्रार निवेदनाद्वारे ऐरोली विधानसभा क्षेत्राचे आ. संदीप नाईक यांनी राज्यपाल भगतसिंह कोशारी यांच्याकडे केली आहे. तसेच याच संदर्भात एका कॅबिनेट दर्जाच्या मंत्र्यांनी केलेल्या आरोपांची सखोल चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली.
प्रभाग रचनेचे जे नियम आणि निकष आहेत ते डावलून महाविकास आघाडी सरकारमधील घटक पक्षांना फायदा होईल यासाठी अनुकूल अशी प्रभागरचना करण्यात आल्याचा आरोप नवी मुंबई भारतीय जनता पक्षाच्या वतीने करण्यात आला आहे. याबाबतचे तक्रारीचे निवेदन 14 डिसेंबर 2021 रोजी ऐरोली विधानसभा क्षेत्राचे प्रथम आ. संदीप नाईक यांनी राज्यपाल भगतसिंह कोशारी यांना दिले. यावेळी माजी महापौर जयवंत सुतार, सुधाकर सोनवणे आणि नवी मुंबई भाजपा जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत उपस्थित होते. नवी मुंबई महापालिका क्षेत्रात नव्याने वाढणारे 11 प्रभाग हे लोकसंख्येच्या आधारावर संपूर्ण शहरात समप्रमाणात वाढणे अपेक्षित आहे परंतु प्रभाग रचना करताना नियम आणि निकष यांचे उल्लंघन करण्यात आले आहे. महाविकास आघाडी सरकारमधील घटक पक्षांना फायदा होईल यासाठी महापालिका प्रशासनाला हाताशी धरून ठराविक विभागातच प्रभागांची संख्या वाढवली जात आहे. निवडणूक प्रक्रियेमध्ये महाविकास आघाडी सरकारमधील घटक पक्षांकडून वारंवार हस्तक्षेप होतो आहे याविषयीची लेखी तक्रार यापूर्वी देखील भारतीय जनता पक्षाच्या वतीने राज्य निवडणूक आयोग यांच्याकडे करण्यात आली होती. नवी मुंबई महापालिका निवडणूक प्रभाग रचनेमध्ये होणारे बेकायदेशीर प्रकार थांबावेत. निवडणूक प्रक्रियेतील राजकीय हस्तक्षेप थांबवून नव्याने वाढणारे अकरा प्रभाग हे ठराविक परिसरात न वाढवता लोकसंख्येच्या समप्रमाणात वाढवावे. नवी मुंबई महापालिकेची संपूर्ण निवडणूक प्रक्रिया ही पारदर्शक आणि निष्पक्षपणे पूर्ण करावी असे निवेदनात नमुद केले आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai