Breaking News
नवी मुंबई : सिडकोने 2018,2019 मध्ये पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत 14 हजार नागरीकांचे घरांचे स्वप्न पुर्ण केले आहे. आत नववर्षाच्या सुरुवातीलाच सिडको सिडको सुमारे पाच हजार घरांची सोडत काढणार आहे. राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी ही माहिती दिली. यामुळे नवीन वर्षात अनेक कुटुंबांना हक्काच्या घरांचे स्वप्न पुर्ण करता येईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत सिडकोने गेल्या तीन वर्षांत 24 हजार घरे बांधली आहेत. त्यातील पात्र ग्राहकांना सध्या घराचा ताबा देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे सिडकोच्या नवीन गृहयोजनेची ग्राहकांना प्रतीक्षा होती. दिवाळीच्या मुहूर्तावर गृहयोजना जाहीर केली जाण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. मात्र, विविध कारणांमुळे हा मुहूर्त टळला. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी आता नवीन गृहयोजनेबाबत घोषणा केली आहे. सिडकोने गृहनिर्मितीवर अधिक भर दिला आहे. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत पुढील चार वर्षांत 87 हजार घरे बांधण्याचे सिडकोचे उद्दिष्ट्य आहे. नवी मुंबईच्या विविध 27 ठिकाणी या घरांचे बांधकाम सुरू करण्यात आले आहे. टप्प्याटप्प्याने 2025 पर्यंत या घरांचा ताबा देण्याची सिडकोची योजना आहे. नववर्षाचे स्वागत उत्साहात करण्याकरिता सिडकोतर्फे जानेवारी 2022 मध्ये अत्यल्प उत्पन्न गट आणि अल्प उत्पन्न गटातील नागरिकांसाठी पाच हजार घरांची सोडत काढण्यात येणार आहे. ही घरे घणसोली, खारघर, कळंबोली, तळोजा आणि द्रोणागिरी या नोडमध्ये परवडणार्या दरात उपलब्ध असणार आहेत अशी माहिती मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. सिडकोनेही या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
नवी मुंबईच्या विविध भागांत घरे बांधली जाणार आहे. खासगी विकासकांपेक्षा ही घरे स्वस्त असणार आहेत. काही ठिकाणी घरांच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात आली आहे. अर्ज स्वीकारणे, सोडत आणि ताबा या प्रक्रिया गतिमान करण्यावर सिडकोचा भर असणार आहे. त्यानुसार नियोजन करण्यात आले असल्याचे सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांनी सांगितले.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai