Breaking News
लवकरच जागावाटपाची घोषणा
नवी मुंबई ः राज्य सरकारने ओबीसी आरक्षण संदर्भात केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून राज्य निवडणूक आयोगाला ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशामुळे पुढील दोन-तीन महिन्यात राज्यातील सर्व स्थानिक संस्थांच्या निवडणुका घेण्याची तयारी राज्य निवडणूक आयोगाने सुरू केली आहे. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी नवी मुंबई निवडणुकीच्या दृष्टीने आपला जागावाटपाचा फॉर्मुला निश्चित केला असून भाजपाला एकत्र टक्कर देण्याचे ठरवले आहे.
गेले तीस वर्ष नवी मुंबईवर वर्चस्व ठेवणार्या गणेश नाईक यांना टक्कर देण्यासाठी महाविकास आघाडीतील तीनही पक्षांनी नवी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक एकत्र लढवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाच्या अनुषंगाने या आठवड्यात स्थानिक पातळीवरील तिन्ही पक्षाच्या नेत्यांची बैठक झाल्याचे खात्रीलायक सूत्रांकडून कळत असून जागावाटपावरही शिक्कामोर्तब झाल्याचे कळते. राज्यातील श्रीमंत महापालिका म्हणून गणल्या जाणार्या महापालिकेवर वर्चस्वाची नामी संधी शिवसेनेला आली आहे. मागील निवडणुकीत हि संधी हुकल्याची सल पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना आहे. गणेश नाईक यांनी पालिकेवरील भगवा उतरवल्या पासून पालिकेवर भगवा फडकवण्यासाठी शिवसेना जंग जंग पछाडत आहे. पण प्रत्येक वेळी गणेश नाईकांनी शह देत नवी मुंबई शहरावर आपली पकड कायम ठेवली आहे. 2019 च्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर शिवसेना आणि भाजप यांची पंचवीस वर्षांची युती तुटल्याने राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्रात सर्वच स्थानिक स्वराज्य संस्था ताब्यात घेऊन राज्यातून भाजपचे राजकीय उच्चाटन करण्याची रणनीती सध्या शरद पवार यांनी आखली आहे.
राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये 27 टक्के आरक्षण ओबीसी समाजाला देण्यात आले होते. परंतु सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे हे आरक्षण आता रद्द झाले असून या आरक्षणाशिवाय निवडणुका घेण्याचे आदेश दिल्याने राज्य निवडणूक आयोगाने निवडणुका घेण्याची तयारी सुरु केली आहे. ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका नको अशी भूमिका सरकारची असली तरी राज्य निवडणूक आयोग दिल्लीच्या अखत्यारीत असल्याने या निवडणूका आत्ताच घेणे भाजपच्या फायद्याचे आहे. भाजप जरी ओबीसी आरक्षण शिवाय निवडणुका नको असे म्हणत असले तरी आता घेतलेल्या निवडणुका त्यांना फायदेशीर ठरतील अशी चर्चा आहे. राज्यात बहुजन समाजाचा मतदार मोठ्या प्रमाणावर असल्याने आरक्षण रद्द झाल्याचे खापर महाविकास आघाडीवर फोडून ओबीसी मतदार आपल्याकडे वळवण्याची तयारी भाजपने केल्याचे सूत्रांकडून कळते. न्यायालयाच्या आदेशामुळे या निवडणुका लवकरच होतील याची जाणीव महाविकास आघाडीला झाल्याने त्यांनी निवडणुकिला सामोरे जाण्याची तयारी सुरू केली आहे. त्याच धर्तीवर ठाणे, मुंबई आणि नवी मुंबई महापालिकाच्या जागा वाटपाच्या चर्चेच्या फेर्या स्थानिक पातळीवरील नेत्यांनी सुरू केल्या आहेत. नवी मुंबई महापालिकेच्या जागावाटपाचा तिढा जवळ-जवळ सुटला असून लवकरच याबाबत घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. परंतु, ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणूक नको अशी भूमिका सरकारने घेतल्याने त्याला राज्य निवडणूक आयोग कसा प्रतिसाद देतो यावर पालिकांच्या निवडणुकांचे भवितव्य अवलंबून आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai