Breaking News
नवी मुंबई : थंडीमध्ये भाज्यांचे उत्पादन जास्त होत असल्याने भाजीपाला स्वस्त दरात मिळतो. मात्र यंदा भाज्यांचे दर दुप्पटीने महाग झाले आहेत. प्रत्येक भाजी 90 ते 100 रु. किलोच्या घरात विकली जात आहे. मध्यंतरी झालेल्या अवकाळी पावसामुळे एपीएमसीतील घाऊक भाजी बाजारात सर्वच भाज्यांची आवक कमी प्रमाणावर होत आहे. किरकोळ बाजारात वाटाणा, टोमॅटो वगळता सर्व भाज्याच्या दरांनी शंभरीपार केली आहे.
एपीएमसीत दररोज 500 ते 600 गाड्यांची आवक होते. गुरुवारी 485 गाड्या दाखल झाल्या. यामध्ये वाटाणा, टोमॅटो, आणि पालेभाज्या यांचे दर स्थिर आहेत. मात्र कोबी, फ्लॉवर, गवार, भेंडी, शिमला मिरची, वांगी, हिरवी मिरचीच्या दारांनी उसळी घेतली आहे. मध्यंतरी झालेल्या अवकाळी पावसामुळे भाज्यांच्या लागवडीवर परिणाम झाला तर थंडीमुळे तोडणीवर परिणाम झाला असल्याने सध्या भाज्यांची आवक कमी प्रमाणात होत आहे. घाऊक बाजारात भेंडी आधी 50 ते 60 रुपयांवरून आता 90 रुपयांवर तर गवार 60 ते 70 रुपयांवरून 100 रुपयांवर गेली आहे. हिरवी मिरची 32 ते 40 रुपयांवरून 56 ते 60 तर शिमला मिरची 50 ते 55 रुपयांवरून 65 ते 70 रुपयांनी विकली जात आहे. आधी सर्वात स्वस्त असलेले कोबी, फ्लावरचे दरही कडाडले आहेत. फ्लावर 22 ते 23 रुपयांवरून 40 ते 50 रुपयांवर गेला आहे. तर कोबी 22 ते 24 रुपयांवरून 36 ते 40 रुपये झाला आहे. मात्र याआधी सर्वात महाग असलेले वाटाणा, टॉमॅटो व पालेभाज्याचे दर मात्र स्थिर आहेत. एकीकडे शेतकरी उध्वस्थ होत चालला आहे, तर दुसरीकडे सामान्य ग्राहक महागाईने बेजार झाला आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai