Breaking News
तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांनी घेतली मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट
मुंबई : तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी रविवारी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या बैठकीत अनेक महत्त्वाच्या राष्ट्रीय आणि राजकीय मुद्द्यांवर चर्चा झाली. भेटीनंतर ठाकरे आणि आणि केसीआर यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना केसीआर म्हणाले की, ही तर फक्त सुरुवात आहे. आम्ही देशातील इतर नेत्यांशीही चर्चा करणार आहोत, असं म्हणत केसीआर यांनी देशात भाजपविरुद्ध तिसर्या आघाडीची मोर्चेबांधणी करणार असल्याचे थेट संकेत दिले आहेत.
यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, गेल्या काही दिवसांपासून आम्ही भेटणार अशी चर्चा होती. तो दिवस आज उजडला. शिवाजी महाराजांच्या जयंतीनंतर दुसर्या दिवशी भेट झाली आहे. हे आमच्यासाठी सौभाग्य आहे. आमच्यातील सदिच्छ भेट होती, त्यात काही लपवण्यासारखे नाही. उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, देशात सुडाचे राजकारण सुरु झाले आहे. आमचे राजकारण तसे नाही. या गोष्टी अशाच सुरु झाल्या तर देशाचं भवितव्य काय? सूडाचं राजकारण करणे ही आमची परंपरा नाही. सूडाचे राजकारण हे आमचं हिंदुत्व नाही. देशात परिवर्तन होण्याची गरज आहे. परिवर्तनाच्या मुद्द्यावर आमचे एकमत झाले आहे. देशातील राजकारण विकासकामांवर चर्चा झाली. संपूर्ण देशात राज्य एकमेंकाचा शेजारधर्म विसारले आहेत. पण राज्याराज्यात चांगले वातावरण राहिले पाहिजे, असे उद्धव ठाकरे म्हणाले. भाजपवर हल्लाबोल करत केसीआर म्हणाले आहेत की, ‘‘भाजपकडून केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर केला जात आहे. या गोष्टीचा मी निषेध करतो. केंद्र सरकारने आपलं धोरण बदलायला हवं. असं न केल्यास पुढे जाऊन त्यांना हे सर्व भोगावे लागणार आहे.’’
दरम्यान, पत्रकार परिषदेपूर्वी झालेल्या बैठकीत आंतरराज्यीय संयुक्त जलसिंचन प्रकल्पांविषयी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केसीआर यांच्यात विस्तृत चर्चा झाली. तसेच राज्यात सुरू असलेल्या उद्योग आणि पायाभूत सुविधा क्षेत्रातील विविध योजना, प्रकल्पांचीही चर्चा करण्यात आली. या बैठकीला मुख्यमंत्री राव यांच्यासोबत शिष्टमंडळात खासदार रणजित रेड्डी, खासदार संतोष कुमार, खासदार बी. पी. पाटील, आमदार पल्ला राजेश्वर रेड्डी, आमदार के. कविता, तेलंगणा राष्ट्र समिती पक्षाचे महासचिव श्रवण रेड्डी, तसेच ज्येष्ठ अभिनेते प्रकाश राज उपस्थित होते. तसेच उद्धव ठाकरे यांच्यासोबत राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई, नगरविकास व सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, खासदार संजय राऊत, खासदार अरविंद सावंत, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिषकुमार सिंह उपस्थित होते. ही बैठक जवळपास दीड तास सुरू होती. ज्यात दोन्ही राज्यांदरम्यानचे विविध क्षेत्रातील सहकार्य वाढवणार्या उपाययोजनांवर भर देण्याबाबतही चर्चा झाली.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai