Breaking News
नवी मुंबई : जवाहरलाल नेहरु पोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी) हे भारतातील प्रमुख कंटेनर पोर्ट असून जेएनपीटीने 2021-22 या आर्थिक वर्षात 5.15 दशलक्ष टीईयूची विक्रमी हाताळणी केली आहे. बंदराच्या स्थापने पासून आजवर एका आर्थिक वर्षात केली गेलेली ही सर्वाधिक माल हाताळणी आहे.
कोरोना महामारी असतानाही 2021-22 या आर्थिक वर्षात जेएनपीटीने केलेल्या या नेत्रदीपक कामगिरीने बंदराचा व्यवसाय नवीन उंचीवर गेला आहे. जेएनपीटीतील कामगारांच्या सामूहिक प्रयत्नांमुळेच ही विक्रमी कामगिरी करता आल्याचे जेएनपीटीचे अध्यक्ष संजय सेठी यांनी बंदराच्या या कामगिरीविषयी बोलताना स्पष्ट केले. कोरोना संकटानंतरच्या काळातही बंदराचा व्यवसाय शाश्वत, कार्यक्षम, किफायतशीर आणि सोयीस्कर बनवण्यासाठी अनेक उपाययोजना राबविण्यात येत असुन भविष्यात देखील आधुनिक पायाभूत सुविधा व नवीन तंत्रज्ञानासह आयात-निर्यात व्यापाराची वेळेवर आणि सुरक्षित वाहतुक सुनिश्चित करण्याचे प्रयत्न सुरु राहतील असेही सेठी यांनी सांगितले.
जानेवारी 2022 मध्ये देखील जेएनपीटीचा माल हाताळणीचा आलेख चढताच राहीला आहे. 2020 च्या 4.47 दशलक्ष टीईयूच्या तुलनेत 2021 मध्ये 5.63 दशलक्ष टीईयू (25.86 टक्के अधिक) माल हाताळणी करत जेएनपीटीने मालवाहतुकीत सातत्यपूर्ण वाढ सुरुच ठेवली आहे. सध्या जेएनपीटी येथे पाच कंटेनर टर्मिनल्स कार्यरत आहेत. ज्यामध्ये जवाहरलाल नेहरू पोर्ट कंटेनर टर्मिनल (जेएनपीसीटी), न्हावा शेवा इंटरनॅशनल कंटेनर टर्मिनल (एनएसआयसीटी), गेटवे टर्मिनल्स इंडिया प्रा.लि. (जीटीआयपीएल), न्हावा शेवा इंटरनॅशनल गेटवे टर्मिनल (एनएसआयजीटी) आणि नव्याने स्थापन करण्यात आलेल्या भारत मुंबई कंटेनर टर्मिनल्स प्रायव्हेट लिमिटेड (बीएमसीटीपीएल)चा समावेश आहे. या बंदरात सर्वसाधारण कार्गोकरिता शॅलो वॉटर बर्थ आणि आणखी एक लिक्विड कार्गो टर्मिनल आहे, ज्याचे व्यवस्थापन बीपीसीएल-आयओसीएल कन्सोर्टीयमद्वारे चालते.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai