Breaking News
मुंबई : ‘तौक्ते’ चक्रीवादळामुळे सागरी किनारपट्टी तसेच राज्यातील काही जिल्ह्यात पडझड झालेल्या प्राथमिक शाळांच्या तातडीच्या दुरुस्तीसाठी एकूण रु. 12 कोटी 93 (बारा कोटी त्र्यान्नव लक्ष फक्त) रुपये एवढा निधी वितरीत करण्यात आला आहे अशी माहिती, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.
16 व 17 मे, 2021 रोजी झालेल्या ‘तौक्ते’ चक्रीवादळामुळे सागरी किनारपट्टी क्षेत्रात तसेच राज्याच्या काही भागात जिल्हा परिषदांच्या प्राथमिक शाळांच्या इमारतींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. शालेय शिक्षण विभागाकडून याबाबत सविस्तर प्रस्ताव प्राप्त झाला होता. त्यानुसार जिल्हा परिषदांच्या प्राथमिक शाळांच्या इमारतींच्या तातडीच्या दुरुस्तीसाठी 12 कोटी 93 लक्ष रुपये निधी राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या मार्गदर्शक तत्वानुसार विभागीय आयुक्तांमार्फत संबंधित जिल्हाधिकारी यांना वितरीत करण्यात आला आहे. याबाबतचा शासननिर्णय 7 मार्च 2022 रोजी महसूल व वन विभागामार्फत निर्गमित करण्यात आला आहे.
रायगड जिल्ह्यातील 492 शाळांसाठी 7 कोटी 38 लाख, ठाणे जिल्हयातील 70 शाळांसाठी 73 लाख, रत्नागिरी जिल्ह्यातील 268 शाळांसाठी 1 कोटी 16 लाख, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 209 शाळांसाठी 58 लाख, पालघर जिल्ह्यातील 164 शाळांसाठी 1 कोटी 20 लाख, पुणे जिल्ह्यातील 22 शाळांसाठी 24 लाख,सातारा जिल्ह्यातील 26 शाळांसाठी 26 लाख, कोल्हापूर जिल्ह्यातील 32 शाळांसाठी 64 लाख, नंदूरबार जिल्ह्यातील 10 शाळांसाठी 4 लाख,नाशिक जिल्ह्यातील 61 शाळांसाठी 64 लाख, धुळे जिल्ह्यातील 2 शाळांसाठी 2 लाख रुपये असे एकूण रु. 12 कोटी 93 लक्ष 24 हजार (अक्षरी बारा कोटी त्र्यान्नव लक्ष चोवीस हजार फक्त) रुपये निधी राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या मार्गदर्शक तत्वानुसार वितरीत करण्यात आला आहे.
शेतपिकांच्या नुकसान भरपाई करिता 125 कोटी रूपये निधी वितरीत
जुलै, 2021 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यात विविध जिल्ह्यात निर्माण झालेल्या पूरस्थितीमुळे झालेल्या नुकसानीसाठी मदत देण्याबाबत 3 ऑगस्ट 2021 रोजी घेतलेल्या मंत्रीमंडळाच्या निर्णयानुसार 125 कोटी रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. जुलै ते ऑक्टोबर, 2021 या कालावधीमध्ये अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या शेतीपिकांकरीता वाढीव दराने मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार राज्य निधीमधून जुलै,2021 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीपिकांच्या झालेल्या नुकसानीकरिता बाधित नागरिकांना निधी वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.जुलै,2021 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यात विविध जिल्ह्यात उद्भवलेल्या पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीकरिता बाधित नागरिकांना मदतीचे वाटप करण्याकरिता वाढीव दराने राज्य निधीमधून एकूण रु. 12507.01 लाख (अक्षरी रुपये एकशे पंचवीस कोटी सात लाख एक हजार फक्त) निधी विभागीय आयुक्त यांचेमार्फत जिल्ह्यांना वितरीत करण्यास शासनाची मंजुरी देण्यात आली आहे. याबाबतचा शासन निर्णय 07 मार्च 2022 रोजी निर्गमित करण्यात आला आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai