Breaking News
महाराष्ट्रातून काँग्रेस-राष्ट्रवादी भुईसपाट ः शिवसेना ठरला राज्यातील प्रबळ विरोधीपक्ष
मुंबई ः महाराष्ट्रात फडणवीस सरकारविरुद्ध जनमत असल्याचे वातावरण असताना मात्र मतदारांनी जळगाव आणि सांगली महानगरपालिकांच्या निवडणुकीत भाजपच्या पदरात भरभरून मते टाकल्याने राज्यात आजही भाजपचाच जोर असल्याचे स्पष्ट झाले आहे. या निकालांमुळे राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस महाराष्ट्रातून भुईसपाट झाल्याचे चित्र पाहावयास मिळाले आहे.
गेली 40 वर्षे जळगाव महापालिकेवर निरनिराळ्या पक्षात जाऊन किंवा आघाडी उघडून सत्ता गाजवणार्या सुरेश जैन यांना जळगावकरांनी पुर्णपणे नाकारले आहे. 75 जागांपैकी 57 जागा भाजपाने मिळवल्या असून राज्यात सत्तेत असलेल्या शिवसेनेला 15 जागा मिळाल्या आहेत. तर एमआयएमने 3 जागा पटकावल्या आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाला एकही जागा जळगाव महापालिकेत मिळवता न आल्याने या दोन्ही पक्षांची खान्देशात वाताहत झाल्याचे चित्र सध्या पाहावयास मिळत आहे.
त्याचबरोबर सांगली पालिकेवर भाजपने प्रथमच आपला विजयाचा झेंडा फडकावला आहे, महापालिका निवडणुकीत भाजपचे 41 उमेदवार विजयी झाले आहेत. सांगली महापालिकेत भाजपकडे एक हाती सत्ता आली आहे. भाजपाचा हा विजय फार महत्वाचा मानला जात आहे. कारण काँग्रेस-राष्ट्रवादीला पश्चिम महाराष्ट्रातील एक बालेकिल्ला ढासळला आहे. भाजपा केंद्रात आणि राज्यात सत्तेत आल्यापासून, पहिल्यांदाच भाजपाला सांगली महापालिकेत सत्ता मिळाली आहे. एवढंच नाही, तर राष्ट्रवादीचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती, पण जयंत पाटील यांना सांगली महापालिकेत मोठा पराभवाचा सामना करावा लागला.
जळगाव निवडणुकीतील नेत्रदिपक विजयामुळे उत्तर महाराष्ट्रात भाजपची सत्ता निर्माण करणारे एकनाथ खडसे हे बाजुला पडले असून त्यांची जागा आता जलसंपदा मंत्री गिरिष महाजन यांनी घेतली आहे.
गेल्या चार वर्षामध्ये राज्यातील बहुतांश नगरपालिका, नगरपरिषदा या भाजपच्या ताब्यात आल्याने भाजपची एकहाती सत्ता महाराष्ट्रात स्थापन झाली आहे. राज्यात मराठा आरक्षण, शेतकरी कर्ज माफी, बेरोजगारी आदी मुद्द्यांवरुन भाजपाविरोधी वातावरण तयार झाले असताना हा विजय 2019 च्या निवडणुकीसाठी आत्मविश्वास वाढवणारा आहे. त्यामुळे लोकसभेबरोबर महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक भाजप घेण्याची शक्यता असून त्यामुळे शिवसेनेला धडा शिकवता येईल असा भाजपच्या नेत्यांचा कयास आहे. सत्तेत राहून विरोधकाची भुमिका साकारणार्या शिवसेनेला मतदारांनी बर्यापैकी कौैल दिला आहे. त्यामुळे राज्यात खरी लढत शिवसेना व भाजपातच असल्याचे दिसत आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai