Breaking News
राज ठाकरे यांचा पत्रकार परिषदेत इशारा
मुंबई ः मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यभरात भोंग्याविरुद्ध हनुमान चालीसा पठण आंदोलन पुकारले आहे. 4 मे पर्यंत सर्व भोंगे उतरवण्याचा अल्टिमेटम त्यांनी दिला होता. राज ठाकरे यांच्या आदेशानंतर मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. तर पोलिसांकडून आंदोलन करणार्यांची धरपकड करण्यात येत आहे. याबाबत राज ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेत माहिती दिली. हा विषय एक दिवसाचा नसून जोपर्यंत मशिदींवरील भोंग्यांचा आवाज पुर्ण बंद होत नाही तोपर्यंत आमचे हनुमान चालीसा आंदोलन सुरुच राहणार असल्याचा स्पष्ट इशारा राज ठाकरे यांनी दिला आहे.
यावेळी राज ठाकरे यांनी सांगितले की, मुंबईत 1 हजार 140 मशिदी आहेत. त्यापैकी 135 मशिदींमध्ये सकाळची अजान 5 च्या आत वाजवली गेली. 90 टक्के ठिकाणी अजान बंद झाली. 5 वाजायच्या आत अजान झाली त्यावर पोलीस काय कारवाई करणार? की फक्त आमच्यावरच कारवाई करणार? असा सवाल त्यांनी विचारला. लोकांना जो त्रास होत होता, तो कमी होईल. हा विषय श्रेय लाटण्याचा नाही. लोकांचा त्रास कमी होणं आहे. मशिदींवर भोंग कायमचे थांबले नाही तर हनुमान चालिसा लावली जाणारच, असा स्पष्ट इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा दिला आहे. हा विषय केवळ आमचा नाही, क्रेडिटचा विषय नाही. हा समाजाचा विषय आहे. हा सर्वसमावेशक प्रयत्न होता, लोकांना जो त्रास होतो तो बंद होईल ही अपेक्षा. केवळ मशिदीवरच्या भोंग्याचा प्रश्न आहे असं नाही, मंदिरावरील भोंग्यांचाही त्रास होत असेल तर तो बंद व्हायला हवा असेही ठाकरे म्हणाले. मुंबईतील बहुतेक मशिदी अनधिकृत आहेत. पण त्यावरील भोंग्याना परवानगी मात्र अधिकृत दिली जाते. हे कसे कशासाठी आणि कोणासाठी? त्यांना 365 दिवस परवानगी का दिली जाते? त्यांनीही रोजच्या रोज परवानगी मागीतली पाहिजे. सर्वोच्च न्यायालयाने जे आदेश दिले आहेत. त्याप्रमाणे झाले पाहिजे, असे राज ठाकरे म्हणाले. हा विषय आजचा नाही तर तो कायमचा आहे. हा धार्मिक विषय नाही. धार्मिक वळण दिलं तर आम्हीही तसंच करु, असा स्पष्ट इशारा राज यांनी यावेळी दिला. भोंगा वाजला तर दुप्पट आवाजात हनुमान चालिसा लागणारच. पोलिसांनी भोंग्यावर कारवाई केली पाहिजे. जर हे थांबले नाही तर पुन्हा उत्तर दिले जाईल, असे ते म्हणाले. जे कायद्याचे पालन करत आहेत, त्यांना सजा देणार, ताब्यात घेणार आणि जे कायदा पाळत नाहीत त्यांना मोकळीक देणार? असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला. तसेच जोपर्यंत भोंगे उतरवले जात नाहीत, निर्णय लागत नाही तोपर्यंत आंदोलन सुरुच राहणार असल्याचे ठाकरे म्हणाले.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai