Breaking News
खारघर : तळोजा औद्योगिक क्षेत्रातून रात्री सोडण्यात येणार्या केमिकलच्या उग्रवासामुळे तळोजा, खारघर, रोडपाली, कळंबोली परिसरातील गावांना त्रास होत आहे. याबाबतची तक्रार तळोजामधील आदर्श सामाजिक संस्थेकडून मुंबई लोकायुक्तांकडे करण्यात आली आहे. नोव्हेंबर महिन्यात या प्रकरणावर सुनावणी होणार आहे.
तळोजा रासायनिक औद्योगिक क्षेत्रातून रात्रीच्या वेळी सोडण्यात येणार्या केमिकलच्या उग्र वासामुळे तळोजा, खारघर, कळंबोली, रोडपाली आणि कामोठे परिसरातील रहिवासी हैराण आहे. या वासामुळे नागरिकांमध्ये आजार बळावण्याची भीती असल्याने तळोजा पांचनंद फेज 1 आणि फेज 2 वसाहत तसेच खारघर, रोडपाली आणि कळंबोलीमधील रहिवाशांनी याविषयी महाराष्ट्र प्रदूषण महामंडळकडे तक्रार केल्या. मात्र, कोणत्याही प्रकारच्या उपाययोजना आजतागायत झालेल्या नाहीत. तसेच याबाबत अधिकार्यांशी संपर्क केल्यास प्रतिसाद दिला जात नसल्याने आदर्श सामाजिक संस्थेचे तसेच इंडियन नॅशनल परिवर्तन पार्टीचे पदाधिकारी राजीव सिन्हा आणि समीर पाटील यांनी मुख्यमंत्री, पर्यावरण विभागाचे प्रधान सचिव, प्रदूषण महामंडळ आणि लोक आयुक्त मुंबई यांच्याकडे केली होती. या तक्रारीची दखल घेत आता राज्याचे लोक आयुक्त व्ही. एम. कानडे यांच्या दालनात याप्रकरणी सुनावणी होणार असल्यामुळे तळोजा, खारघर आणि रोडपालीवासीयांना प्रदूषणाच्या विळख्यातून सुटका होईल, अशी आशा निर्माण झाली आहे.
प्रदूषणातील मुद्द्यावर आता लोक आयुक्तांकडे सुनावणी होणार असल्यामुळे तहसीलदार विजय तळेकर यांनी नुकतीच तळोजा औद्योगिक वसाहती तसेच सिद्धी, करवले गाव आदी ठिकाणांची पाहणी केली होती. तसेच रामकी मुंबई वेस्ट मॅनेजमेंटला भेट देऊन माहिती घेतली होती.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai