Breaking News
आजची नवी मुंबईच्या मुद्दांवर ठाकरेसेनेचा युक्तीवाद
नवी मुंबई ः आजची नवी मुंबईने उद्धव ठाकरे यांची कायदेशीर लढाईत निकटवर्तींयाकडून दिशाभूल होत असल्याचे वृत्त प्रसिद्ध केले होते. या वृत्तात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलावलेली प्रतिनिधी सभा बेकायदेशीर आहे का? असा प्रश्न उपस्थित केला होता. निवडणुक आयोगाकडे शुक्रवारी झालेल्या सुनावणीत ठाकरे यांच्या वकीलांनी शिंदेंच्या प्रतिनिधी सभेच्या वैधतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करुन आजची नवी मुंबईच्या भुमिकेला अप्रत्यक्ष दुजोरा दिला आहे.
शुक्रवारी केंद्रिय निवडणुक आयोगाकडे शिवसेना नेमकी कुणाची यावर ठाकरे गट आणि शिंदे गटात सुनावणी सुरु होती. आजची नवी मुंबईने कायदेशीर लढाईत ठाकरे गटाकडून मुख्य मुद्द्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचा मुद्दा उपस्थित करुन त्यांची निकटवर्तींयाकडून दिशाभूल तर होत नाही ना? असा सवाल उपस्थित केला होता. शुक्रवारच्या सुनावणीत ठाकरे गटाच्या वकीलांनी आजची नवी मुंबईने उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर भर दिल्याचे दिसत आहे.
शिंदे यांनी त्यांची शिवसेना मुख्यनेता म्हणून निवड करण्यासाठी बोलावलेली प्रतिनिधी सभा ही बेकायदेशीर होती का? असा मुद्दा उपस्थित केला होता. शिवसेनेच्या घटनेमध्ये प्रतिनिधी सभा ही शिवसेनाप्रमुख किंवा कार्यकारी अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली घेण्याची तरतूद असताना या नियमाचे पालन झाले नसल्याचा मुद्दा आजची नवी मुंबईने लावून धरला होता. त्यामुळे शिवतारे यांच्या अध्यक्षतेखाली झालेली प्रतिनिधी सभा व एकनाथ शिंदे यांची शिवसेना मुख्यनेता म्हणून झालेली निवड बेकायदेशीर ठरते का असा सवाल उपस्थित केला. त्याचबरोबर शिंदे यांनी जरी आपल्याला 40 आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा निवडणुक आयोगाकडे केला असला तरी आक्षेप याचिकेसोबत त्याबाबतचे जोडपत्र त्यांनी जोडले नसल्याचा खुलासा केंद्रिय निवडणुक आयोगाने माहिती अधिकारात करुन शिंदे यांच्या दाव्याची हवा काढली होती.
शुक्रवारी झालेल्या सुनावणीत ठाकरे गटाच्या वकीलांनी प्रतिनिधी सभेचा मुद्दा उपस्थित करुन शिंदे यांच्या दाव्यावर व निवडीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. शिंदे यांच्या वकीलांनी याबाबत जोरदार युक्तीवाद केंद्रिंय निवडणुक आयोगापुढे जरी केला असला तरी पक्षाच्या घटनेतील तरतूदींना कायदेशीर व अंतिम अधिष्ठान असल्याने निवडणुक आयोग शिंदे यांच्या दाव्याला कसा प्रतिसाद देतो याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. दोन्ही गटाचा युक्तीवाद पुर्ण झाला असून निवडणुक आयोगाने निर्णय राखून ठेवल्याने दोन्ही गटात अस्वस्थता वाढली आहे. सोमवारी दोन्ही गटांना लेखी उत्तर सादर करण्याची सूचना आयोगाने दिले आहेत. यावर पुढील सुनावणी 30 जानेवारी रोजी होणार असल्याने त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai