Breaking News
सुनावणीवर घटनातज्ज्ञांचा अंदाज
मुंबई ः राज्यातील सत्ता संघर्षाने आता अंतिम टप्पा गाठला असून सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी पुर्ण केली असून निर्णय राखून ठेवला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या सूनावणी दरम्यानच्या प्रश्नावलीमुळे निर्णय काय असेल याचा अंदाज आल्याने अनेक घटनातज्ज्ञांनी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटीची शक्यता वर्तविली आहे.
राज्यातील सत्तासंघर्षावरील सुनावणी सर्वोच्च न्यायालयात पुर्ण झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने आपला निर्णय राखून ठेवला असून कदाचित तो पुढील आठवड्यात येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या खटल्यात ठाकरे गटाच्या वतीने ॲड. कपील सिब्बल व ॲड. अभिषेक मनुसिंघवी तर ठाकरे गटाच्या वतीने ॲड. निरज कौल आणि ॲड. हरिष साळवी व राज्यपालांच्यावतीने तुषार मेहता यांनी सर्वोच्च न्यायालयात आपल्या पक्षकारांची भुमिका मांडली.
सुनावणीदरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने राज्यपालांच्या भुमिकेविषयी गंभीर टिप्पणी केल्याने तसेच शिंदे गटाचे वकील निरज कौल व हरीष साळवी यांना वारंवार प्रश्न विचारुन गोंधळात टाकल्याचे चित्र सुनावणी दरम्यान दिसत होते. शिंदे गटाच्या वकीलांची निवडणुक आयोगासमोरील भुमिका व सर्वोच्च न्यायालयासमोरील भुमिकेत फरक असल्याचे मुख्य न्यायाधीश चंद्रचुड यांनी त्यांच्या निदर्शनास आणून दिले.
मुख्य न्यायाधीशांनी मुळ पक्ष आणि विधानमंडळातील पक्ष हे जरी वेगळे असले तरी विधानमंडळातील पक्ष हा काही काळापुरताच असल्याने मुळ पक्ष हाच खरा पक्ष असल्याचे सांगितल्याने न्यायालयाच्या भुमिकेचा अंदाज सर्व घटनातज्ज्ञांना आला आहे. न्यायालय यावेळी घटनेतील अनुसूची 10 अधिक स्पष्ट करणारा तसेच पक्षांतर बंदीवर कठोर निर्बंध लादणारा निर्णय देईल असे मत अनेक घटनातज्ज्ञ व्यक्त करत आहेत. हा निकाल विद्यमान सरकारच्या विरोधात गेला तर राज्यात राष्ट्रपती राजवटीशिवाय पर्याय नसल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालय कोणता निर्णय देते याकडे ठाकरेंसह शिंदे-फडणवीस सरकारचे भवितव्य अवलंबून आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai