Breaking News
पालिका खाजगी संस्थेमार्फत राबवणार उपक्रम ः पहिल्या टप्प्यात एक हजार सायकल्स
नवी मुंबई ः पालिका आयुक्त एन. रामास्वामी यांनी नवी मुंबईतील वाहतुक कोंडीला पर्याय म्हणून नवी मुंबईत शेअरिंग तत्वावर जनसायकल प्रणाली राबवण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्या टप्प्यात एक हजार सायकल्स खाजगी संस्थेमार्फत नवी मुंबईकरांना उपलब्ध होणार असून त्यामुळे वाहतुक कोंडीबरोबरच हवेतील प्रदुषणालाही आळा बसणार आहे. याबाबतची निविदा पालिकेने काढली असून ईच्छुक कंपन्याकडून स्वारस्यांचा प्रस्ताव मागवला आहे.
नवी मुंबई शहर हे 21 व्या शतकातील आधुनिक शहर म्हणून देशात ओळखले जाते. जरी हे शहर नियोजीत असले तरी शहराला प्रदुषणाची आणि वाहतुक कोंडीची समस्या भेडसावत आहे. त्याचबरोबर वाढत्या डिझेल आणि पेट्रोलच्या भावामुळे नवी मुंबईकरांना स्वस्त पण त्यांच्या प्रकृतीचीही काळजी घेणारा सायकलचा पर्याय नवी मुंबई महानगरपालिकेने पालिका क्षेत्रात राबविण्याचा निर्णय घेतला आहे. शहरामध्ये निरनिराळ्या ठिकाणी 20 फुट बाय 5 फुटाचे सायकल स्टँड उभारण्यात येणार असून ते शहरातील बाजारपेठा, रेल्वे स्थानके, उद्याने , शाळा व महाविद्यालये तसेच कामाच्या ठिकाणी जोडणारी साखळी यामाध्यमातून उभी करण्यात येणार आहे. पहिल्या चरणात एक हजार सायकल्सचा प्रायोगिक तत्वावर हा उपक्रम राबविण्यात येणार असून त्यासाठी स्वारस्य मागवणारी निविदा प्रक्रिया पालिकेने सुरु केली आहे. नेरुळ, बेलापुर, सानपाडा आणि वाशी या नोडमध्ये हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. या प्रकारचे उपक्रम देशात मुंबई, पुणे, चेन्नई, हैदराबाद, दिल्ली, आग्रा, गुरुग्राम, वाराणसी व कलक्कम येथे सुरु असून जवळजवळ एक लाख सायकल्स तेथे दररोज वापरल्या जातात. यामुळे शहरातील प्रदुषण तर कमी होतेच शिवाय नागरिकांना छोट्या छोट्या गोष्टी घेण्यासाठी स्वतःची गाडी बाहेर काढण्याची आवश्यकता भासणार नाही. 5 ते 10 रुपये या शुल्कामध्ये नागरिकांना शहरात हव्या त्या ठिकाणी जाता येणार असल्याने त्यांच्या प्रकृतीतही सुधारणा होणार आहे. या सायकल्स पीपीएस तंत्रज्ञानावर असल्याने त्यांची चोरीला जाण्याची शक्यता खूपच कमी आहे. शिवाय सायकल स्टँडजवळ जाहिरातीचे फलक पालिका उभे करणार असून त्यातून पालिकेसाठी महसूल उपलब्ध करण्याचा नवा मार्ग निर्माण होणार आहे. नवी मुंबईतील पाच ते सहा हजार नागरिकांनी याचा दररोज लाभ घेण्याची शक्यता यामधुन वर्तवली जात आहे. कॉलेजमध्ये जाणार्या विद्यार्थ्यांसाठी रेल्वे स्टेशन ते कॉलेज हा पर्याय सोयीचा ठरणार आहे. नवी मुंबईकरांनीही शहराचा आणि आरोग्याचा विचार करुन हा प्रकल्प यशस्वी होण्यासाठी मोठ्या प्रमाणावर सहभाग घेण्याचे आवाहन आयुक्त रामास्वामी एन यांनी केले आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai