Breaking News
विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचे पोलीस आयुक्तांना निवेदन
नवी मुंबई : खारघर येथे झालेल्या महाराष्ट्र भुषण पुरस्कार सोहळ्यामध्ये 14 जणांचा उष्माघाताने मृत्यू झाला होता. या घटनेला कोण जबाबदार आहे? याची चौकशी करण्याची मागणी विरोधी पक्षाकडून सातत्याने केली जात आहे. या कार्यक्रमाची उच्च स्तरीय चौकशी करुन सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी नवी मुंबई शहरातील शिवसेना नेत्यांना घेवून राज्यपालांची भेट घेतली. त्यानंतर नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांची भेट घेवून निवेदन दिले.
महाराष्ट्र भुषण कार्यक्रमाची उच्चस्तरीय चौकशी करुन सदोष मनुष्यधाचा गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिष्टमंडळाने पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांची सीबीडी बेलापूर येथे आयुक्तालयात भेट घेत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. खारघर येथील घटना ही मानव निर्मित आपत्ती असल्याने राज्य सरकार सत्य परिस्थिती दडविण्याचा प्रयत्न करीत आहे असा आरोपही करण्यात आला. सरकारने जारी केलेल्या आकड्यांबाबत आजही संभ्रम कायम आहे. अद्याप स्थानिक पोलीस ठाण्यात या घटनेबाबत अपमृत्यूची नोंद झाली नाही. याबाबत दानवे यांनी खंत व्यक्त केली.
सदर घटनेला जबाबदार ठरलेल्या व नियोजनात निष्काळजीपणा करणाऱ्या स्थानिक वरिष्ठ पोलीसांवरही किमान कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी देखील आयुक्तांकडे करण्यात आली आहे. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, नवी मुंबई जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे, जिल्हाप्रमुख शिरीष घरत, जिल्हाप्रमुख द्वारकानाथ भोईर, रायगड जिल्हा संपर्कनेते बबन पाटील, आदींचा या शिष्टमंडळात समावेश होता.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai