Breaking News
आमदार बच्चू कडू यांनी साधला नवी मुंबईतील कार्यकर्त्यांशी संवाद
नवी मुंबई : सध्या राज्यात सभा घेण्याची स्पर्धा लागली असून त्यात जनतेचे हित बाजूला राहून नेतेमंडळी स्वतचाच स्वार्थ साधत आहेत. एकाने सभा घेतली कि दुसऱयाने लगेच घेतली पाहिजे, कोणाची गर्दी किती यावरच सध्या राजकारण सुरु आहे. मात्र आम्ही व आमचा पक्ष (प्रहार जनशक्ती) या भानगडीत न पडता जनतेची सेवा कशी होईल याचीच काळजी घेत असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री आमदार बच्चू कडू यांनी नवी मुंबईत केले.
यावेळी बोलतांना त्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे व शिंदे गट यांच्यावरही निशाणा साधला आहे. एकाने सभा घेतली की दुसरा सभा घेतो हा मूर्खपणा असल्याचं बच्चू कडू यांनी नवी मुंबईतील कार्यकर्त्यांना संबोधताना म्हटलं आहे. आम्ही व्यवस्थे विरुद्ध नेहमी उभे राहतो आणि म्हणून आमच्यावर खटले दाखल केले जातात. त्याची आम्ही कधीही तमा बाळगत नाही. कारण राज्यकर्त्यांनी अशी व्यवस्था करून ठेवली आहे की प्रजा स्वतचे रोजचे प्रश्न सोडवण्यात व्यस्त आहे, आणि राज्यकर्ते हे आपली पोळी भाजण्यात व्यस्त आहेत. सभेला नागरिक येतात व जातात मात्र सोबत कोणी राहत नाही. आम्ही ज्या ठिकाणी जातो त्या ठिकाणी फक्त निष्ठावंतच येतात असे यावेळी बच्चू कडू म्हणाले.
आपण जनता एवढे बळी पडलो आहोत की, जो देतो त्याच्याकडे जातो. देवाकडे पण आपण नेहमी व्यवहार करतो, दे नाय तर जा. हे लवकर पावते आणि हे लवकर पावत नाहीत. दिवसागणिक लोकांच्या आवडी निवडी बदलतात. आम्ही (प्रहार जनशक्ती पक्ष) एकनाथ शिंदे यांना सांगितले आहे की, आम्हाला काही नको फक्त आणि फक्त दीव्यांग मंत्रालय स्थापन करा, आणि देशातील पहिले दिव्यांग मंत्रालय स्थापन करण्याचे काम प्रहार ने केले आहे. प्रहार ची ओळख भाषणाने किंवा सभेने नाही, जेवढी सभेत गर्दी असते, तेवढ्या लोकांची आम्ही कामे केली आहेत. पण तुमची नजर सभेवर जाते असा टोमणा बच्चू कडू यांनी अन्य पक्षांना लगावला.
नवी मुंबईत मागील दोन वर्षापासून प्रहार जनशक्ती पक्षाचे काम सुरू असून त्याची जबाबदारी नवी मुंबई अध्यक्ष प्रवीण खेडकर व कामगार संघटनेचे चंद्रकांत उतेकर यांच्यावर सोपविण्यात आली असून आजतागत त्यांनी केलेल्या कामाचा आढावा घेण्यासाठी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आमदार बच्चु कडू नवी मुंबईत आले होते.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai