Breaking News
नवी मुंबई ः महाराष्ट्रभूषण पुरस्कार सोहळ्यासाठी खारघरमध्ये आलेल्या श्री सदस्यांना विनाअडथळा प्रवेश तसेच बाहेर पडता यावे, यासाठी कोपरा पुलाच्या शेजारी तात्पुरता पूल उभारण्यात आला होता. या पुलामुळे पावसाळ्यात सायन-पनवेल महामार्गावर पाणी साचण्याची शक्यता वर्तवली जात होती; पण खारघरमधील काही नागरिकांनी पूल तोडण्यास विरोध केल्याने अखेर सिडकोने पोलिसांचा फौजफाटा घेऊन हा पूल जमीनदोस्त केला आहे.
सायन-पनवेल महामार्गावर असलेल्या हिरानंदानी पुलाखालून खारघर वसाहतीत प्रवेश आणि बाहेर पडण्यासाठी एकमेव प्रवेश मार्ग आहे. त्यामुळे ज्येष्ठ निरूपणकर आप्पासाहेब धर्माधिकारी यांना राज्य शासनाकडून दिल्या जाणाऱ्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यासाठी राज्यभरातून मोठ्या संख्येने येणाऱ्या श्री सदस्यांची गैरसोय टाळण्यासाठी कोपरा पुलालगत खारघर वसाहतीत प्रवेश करता यावा, यासाठी सिडकोने तात्पुरता पूल उभारला होता. दरम्यान, या पुलावरून खारघर वसाहतीत विनाअडथळा प्रवेश करता येत असल्याने खारघर कॉलनी फोरमच्या अध्यक्षा लीना गरड यांनी दुहेरी मार्गाचा मोठा पूल उभारण्याची मागणी पालिका तसेच सिडकोकडे केली होती. तसेच हा पूल तोडण्यासही विरोध केला होता. त्यामुळे तोंडावर येऊन ठेपलेल्या पावसाळ्यात कोपरा येथील तात्पुरत्या पुलामुळे सायन-पनवेल महामार्ग पाण्याखाली जाण्याची भीती असल्यामुळे अखेर पोलिसांचा फौजफाटा घेऊन एक दिवसाचा हा तात्पुरता पूल पाडण्यात आला आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai